असेच दुहेरी रूप फुला-फळांचे आहे, किडा-मुंगीचे आहे, पशू-पक्ष्यांचे आहे. त्यांच्यातील सर्जक आणि विध्वंसक दोन्ही शक्तींचा मुक्तआविष्कार पाहून मन थक्क होते आणि विषण्णही होते. मनुष्याच्या संदर्भात मात्र या दुहेरी रूपाने कधी हाहा:कार निर्माण केला, तर कधी लावण्यमय, सोंदर्यमय चांदण्याची बरसात केली. कधी सर्व संहारक, अति-भयंकर युध्ये छेडून मानव जातीला विनाशाच्या कड्यावर आणून सोडले तर कधी असंख्य कबुतरांना अंतराळात सोडून जगात एका निरामय, अभय अशा शांतीमंत्राचे जागरण केले. सूडाच्या, मत्सराच्या, द्वेशांच्या ज्वाळांनी अंतर्बाह्य पेटून राख होण्याचे पत्करले तर कधी अत्यंत करूणामय, दयामय, स्नेहार्द्र, अमृतपय दृष्टिकिरणांचा वर्षाव करून जात्या जीवालाही जगण्याची उभारी दिली. परस्पर-विरोधी तत्त्वांनी भरलेल्या या विश्वातील घडामोडींना एका तटस्थतेने कमालीच्या अलिप्ततेने, साक्षीभावाने पाहण्याे काम करणारे ते विभू, सर्वव्यापी, ठाम आकाश मात्र मला या सगळ्यापेक्षा वेगळेच वाटते. प्रपंचात असूनही अत्यंत निर्लेप, अलिप्त असणार्या या आकाशाचे अनावर आकर्षण मला लहानपणापासून आहे. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या पडवीत जाणार्या चार पायर्यांपैकी तिसर्या पायरीवर बसले आणि पायाशी खाली वाकून आकाशाकडे पाहिले म्हणजे झाडांच्या फांद्यांच्या फटीतून अगदी तळहाताएवढे आकाश दिसायचे. त्या इवल्याशा तुकड्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत बसले म्हणजे ते मोठे होत होत असे की, त्याने जणू सर्व विश्व व्यापले आहे, असे वाटायचे. माझ्या मनात त्यावेळेस एक चमत्कारिक विचार यायचा. मला वाटायचे या विश्वात चंद्र, सूर्य, तारे, कृमी-किटक, झाड-पेड, मानव काहीच नसते तर अन्य काय असते? अन् मग लगेच जाणवायचे की, सर्व अणुरेणूत व्यापून उरलेले आकाश तर असतेच असते. ते कुठेच जाऊ शकत नाही. कारण कुठे जाण्या येण्यासाठी ते खंडीत कुठे आहे? ते जिथे नाही अशी कुठली जागाच नाही. बाकीच्या चार महाभुतांच्या ठायी अंतर्निहित असलेल्या सगळ्या विश्वावर मायेचं पांघरून घालून त्याला निवांत, गुडूप निद्रासुख देण्याचं महान कार्य करणार्या आकाशाकडे मी नेहमीच अचंबित दृष्टीने पाहत असते.
एकदा मात्र आकाशाचा एक अगदीच अनोखा गूढ-गंभीर अनुभव मला आला. उन्हाळ्यात गच्चीवर झोपलो असताना अचानक केव्हातरी मध्यरात्री मल जाग आली. सर्वत्र एक नीरव शांतता भरून राहीली होती. झाडांची पानेदेखील अगदी स्तब्ध होती. वर आकाशात असंख्य तारे चमचमत होते. हात डोक्याखाली घेऊन मी आकाशाकडे डोळ्याची पापणी नलावता पाहू लागली आणि एकाएकी सर्व आकाश आक्रसून त्याचा संकोच होतो आहे. सर्व विश्वालाही ते आपल्या सोबतच लपेटून त्याचाही संकोच करीत आहे. असे जाणवू लागले. शेवटी शेवटी तर हा संकोच इतका पराकोटीचा होऊ लागला की मला श्वास घेण्यासाठीही मोकळे अवकाश राहिले नाही. श्वास अगदी घुसमटू लागला. एखाद्या सर्व बाजूंनी बंद कोठडीत आपण आत आत कोंडले जात आहोत, असे वाटू लागले. या अगदी निर्वाणीच्या क्षणी कोणता तरी अनाम पक्षी पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे क्षितिजाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत उडत गेला. आणि मला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले. एखाद्या स्थितप्रज्ञ पुराणपुरूषासारखे निश्चल परंतु आश्वासक नजरेने ते आपल्याकडे पहात आहे, असे जाणवले. आकाशाच्या छताला टांगलेल्या त्या असंख्य दीपकांच्या झगमगाटाकडे पुन्हा माझे लक्ष वेधत नाही तोच तुटणार्या तार्याची एक प्रकाश-शलाका आकाशात आपले अस्तित्व उमटवून गेली. निस्तब्ध, निर्विकार, क्रियाशून्य, आकाशाच्या पोकळीत पुन: हालचाल सुरू झाली. ही हालचाल, उलाढाल जितकी खरी आहे तितकेच या सर्व गोष्टींना पोटात साठवून घेणारे आकाशही खरे आहे, नव्हे तेच एक खरे आहे!