Publish Date: Mon, 22 Jan 2024 (15:17 IST)
Updated Date: Mon, 22 Jan 2024 (15:25 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 'अलौकिक' म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, न्यायाचं प्रतीक असलेल्या प्रभू रामांचं मंदिरही न्यायबद्ध पद्धतीने बनलं आहे.
पंतप्रधानांनी कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख न करता न्यायालयाचे आभार मानले आणि म्हटलं की, “मी भारताच्या न्यायपालिकेचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी न्यायाची बूज ठेवली.”
राम मंदिर विवादाचाही उल्लेख न करता पंतप्रधानांनी म्हटलं की, “काही लोक म्हणायचे की, काम मंदिर बनलं तर आग लागेल. या लोकांना भारताच्या सामाजिक विवेकाची जाण नाहीये.
राम आग नाहीये, राम ऊर्जा आहे. राम वाद नाहीये, तोडगा आहे. राम केवळ आमचे नाहीयेत, राम सर्वांचेच आहेत. राम वर्तमान नाहीयेत, राम अनंतकाल आहेत.”
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत
आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत, रामलला आता भव्यदिव्य मंदिरात राहतील
हे ठिकाण पवित्र आहेत, हे वातावरण, ही ऊर्जा, ही वेळ सगळं प्रभू रामचंद्रांचं आशीर्वाद आहे
22 जानेवारी 2024 चा सूर्य अद्भूत गोष्ट घेऊन आलाय, पूर्ण देशात उत्साह वाढत जातोय
गुलामीच्या मानसिकतेला तोडून देश उभा राहिलाय
आजपासून हजारो वर्षे नंतरही आजच्या तारखेची, आजच्या क्षणाची चर्चा करतील
ही रामकृपा आहे, ज्यामुळे आपण हा क्षण जगतोय, प्रत्यक्ष घडताना पाहतोय
ही वेळ सामान्य नाही, काळाच्या चक्रावरील सर्वकालीन अमीट स्मृतीरेषा आहे
पावन अयोध्यापुरी आणि शरयूला नमन करतो