Publish Date: Sat, 09 Nov 2019 (16:30 IST)
Updated Date: Sat, 09 Nov 2019 (16:31 IST)
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्यावतीने स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हा आदेश म्हणजे कोणाचा जय किंवा पराजय नाही. तर भारतीय अस्मितेचे जे प्रतिक आहे, त्या संदर्भातील भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे.
सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रात या निर्णयानंतर आहे. याबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो. नवीन भारतासाठी एकजुटीने सर्व लोक या निर्णयाचा सन्मान करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी त्यांच्याबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थिती होते.
राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला.