Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरसः आपल्या पोटातली अॅसिड्स अशा विषाणूंचं विघटन करू शकतात?

कोरोना व्हायरसः आपल्या पोटातली अॅसिड्स अशा विषाणूंचं विघटन करू शकतात?
, शुक्रवार, 27 मार्च 2020 (15:31 IST)
झारिया गोर्वेट
जेवढा कोरोनो व्हायरस धुमाकूळ घालतोय, त्याहीपेक्षा जास्त कहर त्याबद्दलच्या अफवांनी केलाय.कोणी म्हणतं उन्हाळ्यात व्हायरस नष्ट होतो, कोणी म्हणतं आईस्क्रीम खाल्लं तर नक्कीच प्रादुर्भाव होतो, मध्यंतरी लंडनमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती की पांढरे कपडे अधिक शुभ्र करण्याचं किंवा फरशी साफ करण्याचं ब्लीच प्यायलं तर व्हायरस मरतो.
 
आईस्क्रीमच्याअफवेनंतर युनिसेफला पत्रक प्रसिद्ध करून सांगावं लागलं होतं की असं काही नाहीये, ब्लीच पिण्याची कल्पना भयानक होती आणि त्यातून एखाद्याला गंभीर इजा झाली असती ते वेगळंच.
 
या सांगोवांगी गोष्टींमध्ये अजून एका गोष्टीची भर पडली आहे - सतत पाणी, खासकरून कोमट पाणी प्यायल्याने व्हायरसवर मात करता येते. वरकरणी साधी आणि शरीरासाठी हानिकारक नसणाऱ्या या कल्पनेत कितपत तथ्य आहे हे बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
सोशल मीडियावर जी ओरिजनल पोस्ट फिरते आहे त्यात असं म्हटलंय की आपण आपला घसा आणि तोंड सतत ओलं ठेवलं पाहिजे. दर 15मिनिटाला पाणी प्यायलं पाहिजे. असं केल्याने आपल्या घशात किंवा तोंडात व्हायरसचं संक्रमण झालं असेल ते अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जाईल आणि आपल्या जठरातल्या अॅसिडमुळे तो मारला जाईल.
 
“ही कल्पना इतकी भोळसट आहे की मला हसावं की रडावं कळत नाहीये, ”युकेमधल्या लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसन इथल्या साथीच्या रोगांच्या तज्ज्ञ कल्पना सबापथी सांगतात.
 
याचं सविस्तर विलेश्षण करताना त्या म्हणतात की मानवी शरीराला तेव्हाच संक्रमण होतं जेव्हा लाखो व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे काही व्हायरसला पोटात ढकल्याने काही फरक पडणार नाही.
 
“आणि समजा ते सगळे व्हायरस आपण आपल्या पोटात ढकलण्यात यशस्वी झालो तर नाकात प्रवेश केलेल्या व्हायसरचं काय,ते पाण्याद्वारे पोटात ढकलता येणार आहेत का?”त्या सवाल करतात.
 
कोव्हिड-19चा व्हायरस मानवी शरीरात डोळ्यांव्दारेही प्रवेश करू शकतो. म्हणजे संक्रमित झालेल्या हाताने डोळ्याला स्पर्श केला तर हा व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतो.
 
पण आतापर्यंत समोर आलेल्या बाबींमधून हे लक्षात आलंय की संक्रमणाचा सगळ्यात मोठा धोका कोव्हिड-19चा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती शिंकली किंवा खोकली आणि समोरच्या व्यक्तीच्या श्वासाव्दारे हा व्हायरस श्वासनलिकेत तसंच फुफ्फुसात गेल्याने निर्माण होतोय. हा व्हायरस हवेतही काही काळ तग धरून राहू शकतो. या धोक्यावर पाणी पिणं हा उपाय नक्कीच नाही.
 
पाणी पिणं हा कोरोना व्हायरसला थांबवण्याचा उपाय नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामागे अजूनही एक थिअरी आहे.
 
लोकांना वाटतंय की कोरोना व्हायरस पोटात गेला तर तर तिथल्या अॅसिडमध्ये तो तग धरून राहू शकत नाही. साहाजिक आहे पोटातल्या अॅसिडचा pH 1 ते 3च्या मध्ये असतो. कारच्या बॅटरीत वापरल्या जाणाऱ्या अॅसिडची तीव्रताही इतकीच असते. या अॅसिडमध्ये स्टीलही विरघळू शकतं मग एक व्हायरस किस झाड की पत्ती!
 
पण आपण समजतो त्यापेक्षा हा व्हायरस कित्येक पटींनी तगडा असू शकतो. 2012साली सौदी अरेबियात मर्सचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अभ्यासकांना एक असा सुक्ष्मजीव सापडला होता जो कमी तीव्रतेच्या अॅसिडमध्ये जिवंत राहू शकत होता. हा सुक्ष्मजीव कोरोना व्हायरस प्रजातीतला होता. कोव्हिड-19चा चुलतभाऊ म्हणू शकतो आपण त्याला.
 
त्यावेळी डॉक्टरांना हेही दिसून आलं की या व्हायरसने एक पेशंटच्या पोटात बस्तान मांडलं होतं आणि स्वतःचा प्रादुर्भाव करायला तो आतड्यामधल्या पेशींचा आधार घेत होता.त्यावरून लक्षात आलं होतं की या प्रकारच्या व्हायरसचा प्रादुर्भाव पोटातूनही होऊ शकतो.
 
कोव्हीड-19च्या बाबतीत हे खरं आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.एका रिपोर्टनुसार कोव्हीड-19चा प्रादुर्भाव झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांच्या चेहऱ्यावर हा व्हायरस पोचला आणि तिथून श्वसनयंत्रणेत.
 
त्यामुळे पाणी प्यायल्याने या व्हायरसवर मात करता येते या गोष्टीला सध्यातरी कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाची जोड नाही.
 
गुळण्या करणं चांगलं की वाईट
 
खोकला आला किंवा घसा खवखवायला लागला की पहिला घरगुती उपचार म्हणजे कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या करणं. पण हा उपाय किती खात्रीशीर आहे?शास्त्रज्ञांनी 15 वर्षांपूर्वी जपानमध्ये याचा अभ्यास केला होता.
 
त्यांनी 2 महिन्याच्या कालावधीत काही लोकांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्याने दिवसातून तीन वेळा गुळण्या करणाऱ्यांना अँटीसेप्टीक लिक्वीडने गुळण्या करणारे किंवा अजिबात गुळण्या न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी श्वसनाचे त्रास झाले.
 
पण हे निष्कर्ष कोव्हिड-19ला लागू पडतीलच असं नाही. असं समजणं धोक्याचं ठरेल.
 
साध्या सर्दी खोकल्यावर कोमट पाण्याने गुळण्या करणं उपयोगी ठरू शकतं पण या व्हायरसच्या प्रादुर्भावात नाही, असं का? कारण जपानमध्ये जो अभ्यास केला होता त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित होती, तसंच त्यांना स्वयंनियंत्रण करायला सांगितलं होतं.
 
दुसरं म्हणजे या अभ्यासाचा फोकस श्वसनसंस्थेच्या वरच्या भागावर, म्हणजे नाक, घसा, श्वासनलिका आणि नाकातल्या सायनसच्या पोकळ्यांवर होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरोघरी राम म्हणून पुजले जात होते अरुण गोविल, पण आधी झाले होते रिजेक्ट