Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘दिल्ली चलो’ शेतकरी मोर्चा : दिल्लीच्या सीमेजवळ रस्त्यावर घालवली शेतकऱ्यांनी रात्र

‘दिल्ली चलो’ शेतकरी मोर्चा : दिल्लीच्या सीमेजवळ रस्त्यावर घालवली शेतकऱ्यांनी रात्र
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (12:30 IST)
कृषी कायद्याच्या विरोधात 'दिल्ली चलो' मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीपासून 12 ते 15 किलोमीटर दूरवर असणाऱ्या बॉर्डरजवळ रोखण्यात आलं.
 
बॅरिकेड्स लावत या शेतकऱ्यांना रोखण्यात आलं. पण शेतकऱ्यांच्या एका गटाने ही बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला.
 
दिल्लीच्या सीमेजवळच्या या भागामध्ये पोलिस पथकं मोठ्या प्रमाणात रात्री तैनात होती. शेतकरी मोर्चा पुढे सरकू नये म्हणून तीन पातळ्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं आणि ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.
 
दिल्ली - चंदीगढ हायवेजवळ सिंघु बॉर्डरवरही मोठ्या संख्येने पोलीस आणि CRPF जवान हजर होते.
 
मोर्च्यातल्या या शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावरच घालवलीय. पोलिसांनी प्रयत्न करूनही हे शेतकरी परत फिरलेले नाहीत.
 
रॉबिनदीप सिंह नावाच्या एका शेतकऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं, "आमच्याकडे एक महिन्याचं रेशन आहे. आमच्याकडे जेवण तयार करण्यासाठी स्टोव्ह आणि इतर गोष्टीही आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे ब्लॅंकेटही आहे."
 
केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करणारा हा शेतकरी मोर्चा आहे. या आणि पुढच्या काही दिवसांसाठीचं अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू आपल्यासोबतच घेऊन हे शेतकरी निघालेले आहेत. दिल्लीत ठाण मांडण्यांचा त्यांचा बेत आहे. पण ते दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे.
 
शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा
पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरजवळ पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. तसंच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. हरियाणाहून दिल्लीकडे येणाऱ्या सीमा पोलिसांनी बॅरिकेड घालून बंद केल्या आहेत.
 
पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी टॅक्टर, ट्रॉली आणि इतर वाहनांनी दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये शिरण्यापासून थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तयार ठेवला आहे.
 
पंजाबमध्ये परिस्थिती काय?
बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सत सिंह यांच्याशी चर्चा करताना, पोलीस अधीक्षक जनशदीप रंधावा म्हणाले, "शेतकऱ्यांच्या संघटनांनी मोर्चासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत."
 
दरम्यान, भारतीय शेतकरी युनिअनचे गुरनाम सिंह यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेने रवाना झाला असून सद्यस्थितीत तो करनालला पोहोचल्याची माहिती दिली आहे.
 
शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नवीन कृषी कायद्यांमुळे कृषीक्षेत्र श्रीमंत कॉरपोरेट कुटुंबाच्या हाती जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. त्यांच्या माहितीप्रमाणे, ज्या उत्पादनांवर हमीभाव मिळत नाही त्यांना कमी किमतीत विकावं लागतं.
 
दिल्लीत मेट्रोसेवा थांबवली
शेतकऱ्यांचं तिव्र आंदोलन लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिल्ली मेट्रो पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीहून नोएडा, फरीदाबाद, गाजियाबाद आणि गुरुग्रामकडे जाणारी मेट्रोसेवा बंद करण्यात आली आहे.
 
शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' आंदोलनामुळे पोलिसांनी फरीदाबाद-दिल्ली सीमा सील केली आहे. फरीदाबाद पोलिसांच्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्लीत पाय ठेऊ द्यायचे नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार पाडणारी शक्ती तयार करा - अण्णा हजारे