Publish Date: Tue, 16 Jul 2019 (08:44 IST)
Updated Date: Tue, 16 Jul 2019 (08:46 IST)
राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी अंडी आणि कोंबडी शाकाहारी असल्याचं जाहीर करून टाका, अशी मागणी केलीय. ही मागणी करताना त्यांनी नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्यावरचा किस्साही सांगितला आहे.
संजय राऊत म्हणाले, "नंदुरबारमधील एका आदिवासी पाड्यावर भेट दिली असताना तेथील स्थानिकांनी कोंबडीचं जेवण दिलं. कोंबडी खाण्यास मी नकार दिला. त्यावेळी स्थानिकांनी ही आयुर्वेदिक कोंबडी असल्याचा दाखला दिला. ही कोंबडी खाल्ल्यास रोगांपासून मुक्तता होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.
"तर, चौधरी चरण सिंह विद्यापीठातील काही संशोधकांनी आपण आयुर्वेदिक अंड्यांवर संशोधन करत असल्याचं सांगितलं. आयुर्वेदिक अंड देणाऱ्या कोंबडीला फक्त वनस्पती, आयुर्वेदिक खाद्य दिलं जातं. त्यामुळे त्या कोंबडीपासून बनणारे अंडे हे पूर्णपणे शाकाहारी असून शाकाहारी व्यक्तीदेखील प्रोटीनसाठी अंडी खाऊ शकतात," असंही ते पुढे म्हणाले.