Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी: 'आधारभूत किंमत आधी होती, आता आहे आणि पुढेही राहील'

नरेंद्र मोदी: 'आधारभूत किंमत आधी होती, आता आहे आणि पुढेही राहील'
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:48 IST)
कृषीमालाला मिळणारी आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी ही आधीह होती, आता आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत दिली.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले.
 
संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. कोरोनाच्या काळात भारताने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे असं मोदी म्हणाले.
 
मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सभागृहातील सर्व सदस्य उपस्थित राहिले असते तर उचित ठरलं असतं असं पंतप्रधान म्हणाले.
 
भारत हा संधी मिळवून देणारा देश आहे. राज्यसभेत 50 खासदारांनी 13 तास चर्चा केली. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी मी त्यांच्याप्रति आदर व्यक्त करतो असं पंतप्रधान म्हणाले.
 
पृथ्वीच्या भल्यासाठी करण्यात भारताचं योगदान असेल अशी आशा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली गेली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं.
 
कोरोनाविरुद्धची लढाई हे सरकारचं नव्हे नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचं यश आहे.
 
आपण देशाच्या निर्धाराची थट्टा का उडवत आहोत? असा सवाल पंतप्रधानांनी केला. विरोध करावा अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र देशाची सार्वभौमता पणाला लागेल अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
 
सोशल मीडियावर तुम्ही वृद्ध महिला कंदिलासह तिच्या झोपडीबाहेर बसल्याचं तुम्ही पाहिलं असेल. भारताच्या कल्याणासाठी ती महिला प्रार्थना करतेय असं तुम्ही पाहिलं असेल. आपण त्या महिलेच्या भावनांची थट्टा करत आहोत हे लक्षात घ्या. शाळेत कधीही न गेलेल्या माणसांना दिवे लावणं हेही देशासाठीचं काम वाटू शकतं. त्यांच्या भावनांचा आदर कर असं पंतप्रधान म्हणाले.
 
संपूर्ण जग आपल्याकडे आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. नव्या ध्येयाने आपण देश म्हणून कोरोना विषाणूचा मुकाबला केला.
 
लोकसभेत शेतकरी आंदोलनावरून खडाजंगी पाहायला मिळाली होती. राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि अर्थसंकल्पादरम्यानही विरोधी पक्षाने शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. पंतप्रधान मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देऊ शकलेले नाहीत. आज राज्यसभेत पंतप्रधान मोदी राष्ट्रपती अभिभाषणासंदर्भात धन्यवाद दिले.
 
जी मंडळी आपल्या लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्या लोकांना माझं सांगणं आहे की आपली लोकशाही समजून घ्या. आपली लोकशाही विदेशातील लोकशाहीसारखी नाही, मानवी मूल्य जपणारी व्यवस्था आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
भारताचा राष्ट्रवाद संकुचित नाही
भारताचा राष्ट्रवाद हा संकुचित, लोभी, आक्रमक नाही असं पंतप्रधान म्हणाले.
 
डेरेकजी बोलत असताना मी ऐकत होतो. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यसारखे शब्द वापरले. ते बंगालविषयी बोलत आहेत का देशाविषयी असा मला प्रश्न पडला. ते 24 तास हेच बघत असतात. त्यामुळे इथे त्यांनी तेच सांगितलं असावं असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
 
आपली लोकशाही केवळ जगातील सगळ्यात मोठी लोकशाही एवढीच नाही तर भारत लोकशाहीचं माहेरघर आहे. ही आपली संस्कृती आणि तत्व आहे. लोकशाही हा आपल्या देशाचा वसा आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं.
 
संसदेतील प्रत्येकजण शेतकरी आंदोलनावर बोलत आहे. मात्र आंदोलनामागच्या कारणांवर कोणीही बोललं नाही असं पंतप्रधान म्हणाले.
 
शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना पंतप्रधानांनी चौधरी चरण सिंह यांच्या वचनाचा उल्लेख केला.
 
चौधरी चरण सिंह यांना खरी आदरांजली द्यायची असेल तर धोरणं छोट्या शेतकऱ्याभोवती केंद्रित असायला हवीत. कर्जमाफी देऊन छोट्या शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं पंतप्रधान म्हणाले.
 
देवेगौडा यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या बोलण्याने या चर्चेला नवा आयाम मिळाला. कृषी क्षेत्राशी त्यांचा ऋणानुबंध आहे असं पंतप्रधान म्हणाले. 2014नंतर पीकविमा योजनेचा लाभ छोट्या शेतकऱ्यांनाही होईल याची आम्ही काळजी घेतली असं पंतप्रधानांनी सांगितलं.
 
आमच्या प्रत्येक ध्येयधोरणाच्या केंद्रस्थानी छोटे शेतकरी आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
 
आधीच्या सरकारींनी देखील हेच कायदे सुचवले होते?
आधीच्या प्रत्येक सरकारने कृषी क्षेत्रातील कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. कृषी क्षेत्राशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणेची गरज आहे हे सर्वांना मान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
मी जे काही करतो आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा असं पंतप्रधान काँग्रेसला उद्देशून म्हणाले.
 
अनेकांनी ज्यापद्धतीने घूमजाव केलं आहे त्याने मी आश्चर्यचकित झालो. राजकारण एवढं ताकदवान झालं आहे की लोक त्यांची मतं विसरून गेली आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कृषी क्षेत्रासंदर्भात जे करायचं होतं ते मी करत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं.
 
कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. विक्रमी उत्पादन होऊनही कृषी क्षेत्रात काही समस्या आहेत. नव्या गोष्टींबाबत साशंकता, प्रश्न, आक्षेप असणं साहजिक आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
आपले कृषीमंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
 
आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे पण वयस्कर मंडळींना हा त्रास नको असं पंतप्रधान म्हणाले.
 
शेतकऱ्यांनो आंदोलन थांबवा. आपण बोलूया, चर्चा करूया. सगळे पर्याय खुले आहेत असं पंतप्रधान तीन कृषी कायद्यांसंदर्भात म्हणाले.
 
'आंदोलनजीवी ही नवी जमात उगवली आहे'
'आंदोलनजीवी' नावाची नवी जमात उदयास आली आहे. कुठलंही आंदोलन असो, ही मंडळी तिथे असतातच. देशाने अशा लोकांना ओळखायला हवं असं पंतप्रधान म्हणाले.
 
एफडीआय अर्थात परकीय विध्वंसक विचारप्रणालीपासून देशाला वाचवायला हवं असं पंतप्रधान म्हणाले.
 
एमएसपी व्यवस्था आता आहे, भविष्यातही असेल असं पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं.
 
शीख समाजाचं भारताला अतुलनीय योगदान आहे. देशाला त्यांचा अभिमान वाटतो. गुरु साहिब यांची शिकवण मानवजातीसाठी महत्त्वाची आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
माझ्या आयुष्याची काही वर्ष मला पंजाबमध्ये व्यतीत करता आली हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याविषयी काही लोकांचं बोलणं आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामुळे देशाचं भलं होणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.
 
युवा वर्गाच्या कल्याणासाठी जेवढा भर आपण आता देऊ, त्याचा भविष्यात फायदा होईल. देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया युवा वर्ग रचेल याची खात्री वाटते असं पंतप्रधान म्हणाले.
 
नव्या शैक्षणिक धोरणाला ज्या पद्धतीने मंजुरी मिळाली आहे ते कौतुकास पात्र आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
पूर्वोत्तर भारत देशाच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
 
तुमचा सगळा राग माझ्याभोवती केंद्रित याचा मला आनंद आहे. याने तुमचं जगणं शांततामय होईल अशी आहे असं पंतप्रधान म्हणाले.
 
प्रत्येक कायद्यात सुधारणा होते. चांगलं करण्यासाठी चांगल्या सुधारणा आवश्यक आहेत. प्रत्येक सरकार चांगल्या सूचना स्वीकारतं. यासाठी तयारी करून आपल्याला पुढे जावं लागेल असं पंतप्रधान म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या 'त्या' ट्वीटची चौकशी होणार- अनिल देशमुख