Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्यजीत तांबे: 'आधी चुकीचा एबी फॉर्म दिला आणि मीच बंडखोरी केल्याचा बनाव केला'

सत्यजीत तांबे: 'आधी चुकीचा एबी फॉर्म दिला आणि मीच बंडखोरी केल्याचा बनाव केला'
, शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (18:09 IST)
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली. तांबे-थोरात कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला आणि आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले.
 
याआधी काँग्रेसमध्ये असलेल्या सत्यजीत तांबे यांनी खुलासा केला की त्यांना मुद्दामहून चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. आणि असा बनाव करण्यात आला मी बंडखोरी केली. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे तेव्हा अपक्षच राहणार आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
 
चुकीचा एबी फॉर्म देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालय जबाबदार आहे, त्यावर भारतीय काँग्रेस काही कारवाई करेल का हे पाहावे लागेल असं सत्यजीत तांबे म्हणाले.
 
काय बोलले सत्यजीत तांबे?
ज्या ज्या वेळेस मी पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा मला सांगितलं जायचं की तुमच्या घरात वडील आमदार आहेत. त्यामुळे तुम्हाला परिषद देता येणार नाही.
 
खरं तर नाशिक पदवीधर मतदारसंघ हा माझ्या वडिलांनी कष्टाने बांधलेला बालेकिल्ला आहे. पण वारंवार मला सांगितलं जायचं की, वडील आमदार आहेत, त्यामुळे मला संधी देता येणार नाही.
 
शेवटी सात-आठ महिन्यांपूर्वी मी एचके पाटील यांना सांगितलं की, मला संघटनेत तरी संधी द्या. पण मला सांगितलं गेलं की, वडिलांच्या जागेवरून तुम्ही निवडणूक लढवा.
 
तेव्हा मला खूप संताप आला. मला जी संधी द्यायची असेल तर संघटनेनं द्यायला हवी, वडिलांच्या जागेवर काम करण्याची माझी मानसिकता नव्हती.
 
हे सगळं सुरू असताना पदवीधर निवडणूकीची गडबड सुरू झाली. त्याचवेळी माझ्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस माझ्या पुस्तकप्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमचा त्यांच्यावर डोळा आहे, असं विधान केलं. सभागृहातून त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद आला.
 
या सगळ्या दरम्यान माझ्या वडिलांनी अशी भूमिका घेतली की, जर पक्ष संधी देत नसेल तर वडिलांच्या नात्याने मी संधी द्यायला हवी. त्यानुसार आम्ही घरात चर्चा केली. माझे वडील होते, थोरातसाहेब होते आणि आम्ही चर्चा केली.
 
तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र
आम्ही याबद्दल प्रभारी एचके पाटील यांना सांगितलं. कारण काँग्रेसमध्ये विधान परिषदेची उमेदवारी ही राज्यातून ठरत नाही. त्यांनीही सांगितलं की, आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देतो, तुम्ही कोणी निवडणूक लढवायची हे ठरवा.
 
फॉर्म भरायच्या शेवटची तारीख जवळ आली, तेव्हा नागपूरला एबी फॉर्म घ्यायला माणूस पाठवा असं सांगितलं. माझा माणूस दहा तारखेला नागपूरला गेला. तो दहा तारखेला संध्याकाळपर्यंत तिथे होता. रात्री त्याने एबी फॉर्म घेतला आणि अकरा तारखेला सकाळी पोहोचला.
 
हे एबी फॉर्म सीलबंद लिफाफ्यातून येता. आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा लिफाफे उघडले, तेव्हा लक्षात आलं की, हे एबी फॉर्म चुकीचे आहेत. एक फॉर्म औरंगाबदचा होता, तर दुसरा नागपूर पदवीधरचा होता. त्यानंतर दिलेल्या फॉर्मवर सुधीर तांबेंचं नाव होतं.
 
या सगळ्या गोंधळाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस घेणार का?
 
हा आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट आहे, असा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला.
 
माझ्याच वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर केली गेली? अमरावती आणि नागपूरचे उमेदवार दिल्लीतून जाहीर का गेले नाहीत? ही सगळी स्क्रिप्ट केवळ बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेंना बदनाम करण्यासाठी आहे.
 
शेवटच्या क्षणापर्यंत मी एचके पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी बाळासाहेब थोरातांशी बोललो. तेव्हा त्यांनी म्हटलं की, आपण काँग्रेसकडून लढायचं आहे. मी त्यांना म्हटलं की, मी काँग्रेसचाच उमेदवार आहे, पण एबी फॉर्मची तांत्रिक गडबड झाली आहे.
 
काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचे षड्यंत्र
त्यानंतर एचके पाटील यांच्याशी बोलल्यावर मी त्यांना हे सगळं सांगितलं आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला गेला असला तरी महाविकास आघाडीचा पाठिंबा मला जाहीर करा. याबद्दल मी महाविकास आघाडीतल्या नेत्यांशीही बोललो. मी संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो.
 
पण मला जाहीर माफीचं लेखी पत्र मागण्यात आलं. मी त्यालाही तयार झालो. मी दिल्लीच्या संपर्कात होतो, पण दुसरीकडे प्रदेशाध्याक्ष माझ्याविरोधात बोलत होते. सत्यजित तांबेंनी फसवलं म्हणत होते. आणि त्यानंतर महाविकास आघाडीने दुसरा उमेदवारच जाहीर केला.
 
एका व्यक्तीच्या आमच्या परिवाराप्रति असलेल्या द्वेषापोटी हे सगळं केलं गेलं. पण मी आता त्याबद्दल बोलणार नाही. मला आता पुढचं काम करायचं आहे.
 
माझ्या वडिलांवर एका क्षणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाची कारवाई करण्याआधी कारणे दाखवा नोटीस दाखवावी लागली. तेही केलं गेलं नाही.
 
मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं षड्यंत्र सुरू आहे. त्याविरोधात मी लढलो आणि लढत राहणार.
Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिल गेट्सच्या चपातीवर मोदींची प्रतिक्रिया