Publish Date: Tue, 03 Sep 2019 (10:38 IST)
Updated Date: Tue, 03 Sep 2019 (10:45 IST)
भांडवली गुंतवणूक वाढत नाही, तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं अशक्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.
"देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक क्षेत्रात लोकांना कमी करण्याचा पर्याय अवलंबला जातोय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.
"सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं," असं आवाहनही त्यांनी केलं.