Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार असे ठरले या विधानसभा निवडणुकीचे 'मॅन ऑफ द मॅच'

शरद पवार असे ठरले या विधानसभा निवडणुकीचे 'मॅन ऑफ द मॅच'
, शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (07:38 IST)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 च्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याची ताजी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रात शरद पवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं.
 
साताऱ्यातील शेवटच्या सभेत तर भर पावसात शरद पवारांनी भाषण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. त्यामुळे शरद पवार एकटे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर भारी पडले का, असा सहाजिक प्रश्न चर्चेत आलाय.
 
शरद पवार एकटेच भिडले?
लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर निघाले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली, चारा छावण्यांना भेटी दिल्या. तिथली व्यथा शरद पवारंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.
 
त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी प्रचार रॅलीही केल्या. यादरम्यान शरद पवार यांना तरूणांचाही मोठा पाठिंबा दिसून आला.
 
शरद पवार यांनी महाराष्ट्रभर मॅरेथॉन सभा घेतल्या. ठिकठिकाणी प्रचार केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर वरिष्ठ मंत्री आपापल्या जिल्ह्यात, मतदारसंघात अडकून पडल्याचे चित्र दिसलं.
webdunia
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे बीबीसी मराठीच्या चर्चेत बोलताना म्हणाले, "महाराष्ट्राच्या विधानसभेचा सामना भाजप आणि शिवसेना मिळून जिंकलेत. दोघांना मिळून बहुमत मिळालंय. मात्र 'मॅन ऑफ द मॅच' त्यांच्या संघातले नाहीत. शरद पवार हे 'मॅन ऑफ द मॅच' आहेत. पवारांनी हे दाखवून दिलंय की, भाजप-शिवसेना अजिंक्य नाहीत. त्यांचा परभाव करता येतो."
 
तसंच, राष्ट्रवादीला मिळालेला विजय सगळ्या विरोधी पक्षांना ऊर्जा देणारा आहे, असंही निखील वागळे म्हणाले.
 
तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "शरद पवार प्रचारात नसते, तर राष्ट्रवादी टिकू शकली नसती. शरद पवार आक्रमकतेने उतरल्यानं राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही प्रेरणा मिळाली. शरद पवारांना शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात स्वीकारार्हता आहे. शरद पवारांना श्रेय देण्यासोबत राष्ट्रवादीनंही गेल्या पाच वर्षांत चांगली संघटना बांधणी केली."
 
राष्ट्रवादीतले पवारांचे शिलेदार सोडून गेले, त्याचाही पक्षाला फायदा झाल्याचं दिसून येतं. नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि सकारात्मक संदेश गेला, असंही हेमंत देसाई सांगतात.
webdunia
ईडी प्रकरण आणि भर पावसातलं भाषण यांचा किती प्रभाव?
महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीनं पाठवलेल्या कथित नोटिशीनंतर शरद पवारांनी स्वत: चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली आणि ईडीलाच गोंधळात टाकलं. ज्या दिवशी शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले, त्याच दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांना भेटून चौकशीला न येण्याची विनंती केली.
 
त्यावेळच्या या सर्व घटनाक्रमामुळं शरद पवार यांच्याबद्दल सकारात्मक संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला. शिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्येही उत्साह भरला.
 
हेमंत देसाई म्हणतात, "ईडी प्रकरणाचाही मोठा प्रभाव झाला. कुठेतरी ठिणगी पडायला लागते, तशी ईडीच्या कथित चौकशीच्या नोटिशीची ठिणगी पडली."
 
त्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात शरद पवार यांनी सभा घेतली. शरद पवार यांची सभा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र, शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही आणि भर पावसात उदयनराजेंसह भाजपवर टीका करत राहिले. या भाषणाची सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
 
विधानसभा - साताऱ्यातील निकाल :
सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
वाई - मकरंद पाटील (राष्ट्रवादी)
कोरेगाव - महेश शिंदे (शिवसेना)
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण - शंभूराज देसाई (शिवसेना)
फलटण - दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
माण - जयकुमार गोरे (भाजप)
तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना आता भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करणार का?