Publish Date: Tue, 21 Apr 2020 (18:48 IST)
Updated Date: Tue, 21 Apr 2020 (18:51 IST)
महाराष्ट्रातील संत असुरक्षित आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. या हत्याकांडात पोलीसदेखील जबाबदार आहेत. संपूर्ण गावाला सील करून गावाची हत्या करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिली आहे.
"महंतांची हत्या करणारे राक्षसच. त्यामुळे ज्यांनी हे केलं त्यांचा वध करणं चुकीचं नाही. लॉकडाऊननंतर लाखो नागा साधूंना घेऊन त्या गावाला आणि सरकारला घेराव घालू. देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारच्याविरोधात मोठं आंदोलन केलं जाईल. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू-संत सुरक्षित नाहीत," अशा शब्दांत महंतांनी नारजी व्यक्त केली.
PTIच्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमध्ये कांदिवलीहून तिघेजण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभाग घण्यासाठी गुजरातमधल्या सुरतला जायला निघाले होते. मात्र पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ एका जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली.
ही माणसं चोर असल्याचा संशय जमावाला होता. त्यामुळे जमावाने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात तिन्ही पीडितांचा मृत्यू झाला. यामध्ये 70 आणि 35 वर्षांचे दोन साधू, आणि 30 वर्षांच्या त्यांच्या ड्रायव्हरचा समावेश आहे.
याप्रकरणी 110 जणांना अटक केली असून त्यात 9 अल्पवयीनांचा समावेश आहे, असं पालघर पोलिसांनीही ट्वीट केलंय.