Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे : कोरोना हा व्हायरस आहे तो म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

उद्धव ठाकरे : कोरोना हा व्हायरस आहे तो म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
, बुधवार, 3 मार्च 2021 (17:36 IST)
"आम्ही भरलेली थाळी देतोय, रिकामी थाळी कोरोना घालवण्यासाठी दिली नाही," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुधीन मुनगंटीवर यांनी केलेल्या टिकेला उत्तर दिलं आहे.
 
"मी विधानसभेचं कामकाज बघत होतो सुधीरभाऊ मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. सुधीरभाऊ तुमच्यातली कला जीवंत ठेवा. देवेंद्रजींना आणि चंद्रकांतदादांना भिती वाटायला लागलीय," असं उद्धव ठाकरे म्हणालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेले दोन दिवस विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसात अनेक घडामोडी सभागृहात घडल्या.
 
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राला जे काही हवंय ते दिलंय. पण हा करंटेपणा आहे. मराठी माती आणि मराठी माता हे विसरू शकणार नाही. आम्ही भिकारी नाही. सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी पत्र दोन वेळा केंद्राकडे दिले आहे. तुम्हाला सगळे पाहिजेत. सावरकर, पटेल, गांधी. तुम्ही काय आदर्श निर्माण केले. आम्ही संभाजीनगर नाव जरुर करू. आम्हाला हिंदुत्व शिकवता," असा टोला उद्धव ठाकरे यांनी सांगितली आहे.
 
यावेळी सुधीर मुनगंटीवारच्या नारायण भंडारीच्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांचं उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला गेला. त्यावर सत्ताधारी आमदार चिडले. त्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली.
 
"कोरोना हा व्हायरस आहे तो म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. तो पुन्हा आला," असा टोला उद्धव यांनी फडणवीस यांनी हाणला आहे
"इतर आजारामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर कळायचं तो कोव्हीड पॉझिटिव्ह आहे. मग अंडरलाईन कोव्हिड असा मृत्यू नोंद केला. आम्ही लपवालपवी केली नाही. आम्ही खोटं बोलत नाही मग ते बंद दाराआड का असेना? केंद्राने लॉकडाऊन केलं त्याआधी मी 8 दिवस फोन करून सांगत होतो लोकल बंद करा. मजूरांना ट्रेनची व्यवस्था करा... पण 'अभी नही हो सकता' असचं उत्तर मिळत होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
 
"आमची लॉकडाऊन करायची इच्छा नाही. गोरगरीबांची चूल पेटत राहीली पाहीजे. चूल का म्हणालो कारण गॅसच्या किंमती वाढत चालल्या आहेत. पेट्रोलची सेंच्युरी आणि गॅसची हजारी होतेय. मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल. तरी मी गरीबांसाठी माझ्या लोकांसाठी काम करणार."
 
"पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आहे. त्याची काळजी केली पाहिजे. त्यांची वीज कापली जाते. शौचालयं तोडली जातात. त्यांच्या मार्गात खिळे टाकले जात आहेत. शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे. शेतकरी काय अतिरेकी आहेत का, देश तुमची खासगी मालमत्ता आहे का, तुमची मातृसंस्था देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. फक्त फक्त भारतमाता की जय म्हणून देशभक्ती सिध्द होत नाही," असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर म्हटलंय.
 
विदर्भ माझं आजोळ आहे. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका. विदर्भ वेगळा होणार नाही, असा टोला त्यांनी हाणला आहे.
 
बाळासाहेबांची आक्रमकता ही बाबरी पाडली तेव्हा दिसली. देवेंद्रजी म्हणतात हे येड्या गबाळ्याचं काम नाही पण जेव्हा बाबरी पाडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले होते. कोणी पाडली बाबरी विचारलं. राम मंदीरासाठी जनतेकडून पैसे मागता कारण आमचं नाव दिलं पाहिजे. हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवू नका, असं उद्धव यांनी म्हटलंय.
 
आपण एकत्र होतो. कदाचीत पुढे आपण सगळे एकत्र येऊ, असं उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला.
 
शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही, यूपीने त्यासाठी सहकार्य करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
फडणवीस यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. कोव्हिडच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
पहिल्या दिवशी मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. लवकरात लवकर मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत निर्णय घ्यावा असा पवित्रा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
 
त्यांना उत्तर देताना उप-मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्यपालांनी 12 आमदारांची विधान परिषदेवर निवड केलेली नाही. ज्या दिवशी ते 12 आमदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करतील त्या दिवशी आम्ही वैधानिक विकास महामंडळावर निर्णय घेऊत. त्यांच्या या उत्तराने विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर आणखी तीव्र टीका केली.
 
सरकारची ही भूमिका अयोग्य असल्याचे मत मांडत 12 आमदारांसाठी मराठवाडा-विदर्भाला ओलीस ठेऊ नका असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
 
तर 30 हजार जणांचे प्राण वाचले असते
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कोव्हिडच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला असाही आरोप फडणवीसांनी केला.
 
"सरकारने कोरोनाच्या काळात नीट नियोजन आणि व्यवस्थापन केलं नाही त्यामुळे अतिरिक्त 30 हजार लोकांचे प्राण गेले. आपल्याला 30 हजार जीव वाचवता आले असते," असं फडणवीस म्हणाले.
 
'माझं कुटुंब माझी जबाबदारी'
देवेंद्र फडणवीस यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही शरसंधान साधले. आधी होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता आलंय मी जबाबदार. जर सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही जबाबदार असूत तर सरकार काय करत आहे. सरकारची काय जबाबदारी आहे असा सवाल त्यांनी केला.
 
"जबाबदारी तुमची आणि श्रेय आमचं असं काम सध्या चालू आहे. लहान मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आलं. भंडाऱ्यात एवढी मोठी दुर्घटना झाली त्यासाठी केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं," असं फडणवीस म्हणाले.
 
सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून विधानसभेत चर्चा
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीटवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "देशासाठी आम्ही जर सेलिब्रिटींना ट्वीट करायला सांगितले तर आम्हाला अभिमान आहे. यातून आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती दिसतेय."
 
यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या ट्वीटची चौकशी कुणीही केली नाही. भाजप पक्षाच्या आयटी सेलचे काहीजण सापडले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे."
 
'आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नाही'
21 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हवरूनही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
 
"21 फेब्रुवारीचं मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह उत्तम होतं. मुख्यमंत्री म्हणाले माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही. मुख्यमंत्री महोदय जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही.
 
"भंडाऱ्यामध्ये जी घटना घडली. सरकारकडे 6 महिने प्रस्ताव पडून होता पण सरकारने काही केलं नाही. कोणाला फुरसत नव्हती. बालकं मरून गेली.
 
"या सरकारला संतांचाही विसर पडला आहे. संत शिरोमणी नामदेवांचं मंदीर पंजाबमध्ये आहे. पण त्याचवेळी 750 वी जयंती संत नामदेवांची आहे. त्यांचा सरकार का विसर पडला?
 
"राजकीय मेळावे, हॉटेल, दारूची दुकानं उघड्यावर कोरोना वाढत नाही. धार्मिक स्थळं उघडल्यावर कोरोना कसा वाढतो?
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी