Publish Date: Thu, 11 Jun 2020 (15:25 IST)
Updated Date: Thu, 11 Jun 2020 (20:52 IST)
देशात आत्मनिर्भरतेच्या उद्देशाला गती प्राप्त झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 95 व्या वार्षिक सत्राला संबोधित करताना केलं. कोरोनाला टर्निंग पॉईंट बनवायचय आणि हा टर्निंग पॉईंट म्हणजेच आत्मनिर्भर भारत आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.
हा कार्यक्रम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आला. पंतप्रधान 10 दिवसांत दुसऱ्यांदा उद्योग क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधत आहेत. याआधी 2 जून रोजी त्यांनी भारतीय उद्योग परिसराच्या वार्षिक अधिवेशनात अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नेमकं काय - काय म्हणाले हे दहा प्रमुख मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.
'टर्निंग पॉइंट म्हणजे आत्मनिर्भर भारत'
जग कोरोनाचा सामना करतंय, भारतही यात मागे नाहीये. कोरोनाला टर्निंग पॉईंट बनवायचं आहे. हा टर्निंग पॉइंट म्हणजे आत्मनिर्भर भारत.
आपण मेडिकल, इलेक्ट्रॉनिक, सौर ऊर्जा, वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भर असायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टींची सगळ्या भारतीयांना चिंता वाटत होती.
गेल्या ५ वर्षांत भारताच्या आत्मनिर्भरतेच्या उद्देशाला गती प्राप्त झाली आहे. कोरोनाच्या संकटानं याला अधिक गती दिली आहे.
आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत इतर देशांवरचं अवलंबित्व कमीतकमी करेल. ज्या गोष्टी भारत आयात करतोय, भविष्यात त्याच गोष्टी भारत निर्यात करेल.
उद्योजकांनी पुढे येत आर्थिक सुधारणांचा लाभ घ्यावा. देशाच्या प्रगतीत आणखी हातभार लावावा.
भारतातले शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतात. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आवश्यक वस्तू सेवा कायद्यात बदल केले आहेत. यामुळे शेतकरी आता त्यांचा शेतमाल हवा तेव्हा हवा त्या राज्यात त्यांच्या शर्थींवर विकू शकतात.
मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात बंगालच्या ऐतिहासिक क्षमतेला आपल्याला पुनरुज्जीवित करायचं आहे.
ही वेळ बोल्ड निर्णयांची (डिसिजन) आहे. बोल्ड गुंतवणुकीची (इन्व्हेस्टमेंट) आहे. यामुळे आम्ही उद्योग क्षेत्राला संकटातून काढण्यासाठी मदत केली आहे.
भारत सरकार ई-मार्केट (GEM) लोकांना सरकारशी जोडलं आहे. यामुळे लोक त्यांची सेवा डायरेक्ट भारत सरकारला उपलब्ध करून देऊ शकतात. पूर्वी यात अडचणी होत्या. पंतप्रधानांपर्यंत तुमचा माल पोहोचू शकता.
इंटरनॅशनल सोलार अलायन्स एक मोठं क्षेत्र बनत आहे. माझं इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सला आवाहन आहे की, सौरऊर्जा मोठं मार्केट होणार आहे. या क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करू शकतो का? ICC आणि त्यांचे सदस्य या विषयात त्यांचं टार्गेट गाठू शकतात.
कार्यक्रमाच्या अखेरीस पंतप्रधान मोदींनी स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. भालो खासे अशा खास बंगाली भाषेत शुभेच्छा दिल्या.