भाजपच्या नवनिर्माणाची जबाबदारी संघाकडे!
कुशाभाऊ ठाकरे नगर इंदूर , शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 (18:13 IST)
भाजपचा चेहरा-मोहरा बदलत पक्षाच्या नवनिर्माणाची जबाबदारी आता संघाच्या खांद्यावर असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या जाहीर भाषणात याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षणाची घोषणा गडकरींनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच केली होती, आज या संदर्भात जबाबदारीचे वाटपही त्यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अलोक कुमार तर अंत्योदय योजनेसाठी कर्नाटकच्या वामनाचार्य यांच्या नावाची आज त्यांनी घोषणा केली. प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी खास अभ्यासक्रमाची आखणी करणे, प्रशिक्षकाची नियुक्ती करणे, प्रशिक्षणासाठी लागणारा विषय व त्याची व्याप्ती निश्चित करणे. याची जबाबदारी या दोघांवर असणार आहे. संघाच्या कार्यकर्त्यांमधील निरपेक्षतेचा गुण भाजप कार्यकर्त्यांनीही अंगीभूत करावा याचे धडे आजही त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून कार्यकर्त्यांना दिले. दिल्लीत येऊन नेत्यांच्या भेटी घेतल्याने कोणत्याही नेत्याला अथवा कार्यकर्त्याला तिकिट मिळत नसते. कटआऊट लावणे, हार-गुच्छ, पाया पडणे अशा चमचेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापूर्वीच गडकरींनी तंबी दिली होती. आज पुन्हा त्यांनी आपल्या भाषणातून असे नेते आणि कार्यकर्त्यांना गडकरींनी चांगलेच सुनावले.
गडकरींपाठोपाठ पक्षाचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनीही आज संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. संघाच्या सांगण्यावरूनच आपण अध्यक्षपद सोडल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. संघामध्ये व भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसून, आपण सर्वजण संघ परिवारातीलच असल्याचे ते म्हणाले. गडकरी व गोळवलकर संघाचा पाया रचणाऱ्या माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी व नितीन गडकरी यांच्यात साम्य असल्याचेही अडवाणी म्हणाले. गडकरी यांनी भाजपचे अध्यक्षपद 9 फेब्रुवारी रोजी स्वीकारले. याच दिवशी गोळवलकर गुरुजींचा तिथीने वाढदिवस आहे. राष्ट्रीय अधिवेशनाचा आज समारोप होत असून, गोळवलकर गुरुजींचा आज इंग्रजी कॅलेंडरनुसार वाढदिवस असल्याने हा चांगला योगायोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडवाणींनी गुरुजींच्या वाढदिवसाविषयी स्पष्ट करताच छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असल्याची आठवण उपस्थितांनी त्यांना करून दिली. संघाच्या विचारांचा पाया रचण्यात गोळवलकर गुरुजींचे महत्त्वाचे योगदान आहे, गडकरी हेही संघाच्याच विचारांचे नेते आहेत हे विशेष