Publish Date: Thu, 17 Jan 2019 (13:19 IST)
Updated Date: Thu, 17 Jan 2019 (13:22 IST)
'सिम्बा' चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत असून बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा'ला धमाकेदार प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच रोहित शेट्टीने रणवीर सिंग, सारा अली खानसोबत काम केले होते. पण मागच्या वर्षी त्याचा प्रदर्शित झालेला 'दिलवाले' हा चित्रपट फारसा गाजला नाही. त्यामुळे शाहरुख आणि त्याच्यात वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. रोहित शेट्टीने अलीकडेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. रोहितला 'सिम्बा'ला मिळत असलेल्या यशानिमित्त त्याच्या 'दिलवाले' चित्रपटाबद्दलही प्रश्र्न विचारण्यात आले. तो यावेळी म्हणाला, शाहरुख आणि माझ्यात जर कोणत्याही प्रकारचा वाद असता, तर रेड चिलीज अंतर्गत मी माझ्या 'सिम्बा' चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन केले नसते. कोणत्याही प्रकारचा वाद शाहरुख आणि माझ्यात नाही. आमच्या वादाच्या चर्चा झाल्या, त्या अफवा आहेत. 'सिम्बा'च्या क्रेडिट सिन्सला लक्षपूर्वक पाहिले, तर डीआय आणि कलरचे क्रेडिट शाहरुखच्या कंपनीला देण्यात आले आहे. येथेच 'झिरो' चित्रपटाचेही एडिटिंग झाले होते. आमचा एक चित्रपट गाजला नाही, याचा अर्थ असा होत नाही, की आमच्यात वाद निर्माण झाला', असेही रोहितने सांगितले आहे.