Publish Date: Sat, 11 Apr 2020 (09:08 IST)
Updated Date: Sat, 11 Apr 2020 (09:10 IST)
राज्यात कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
राज्यात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.