Publish Date: Sat, 03 Apr 2021 (07:17 IST)
Updated Date: Sat, 03 Apr 2021 (07:19 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका आता अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. शुक्रवारी राज्यात ४७ हजार ८२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चार हजारहून अधिकने वाढला. तसेच २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९१ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
शुक्रवारी महाराष्ट्रात ४७ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असतानाच २४,१२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के इतके झाले आहे.