Publish Date: Mon, 22 Feb 2021 (07:30 IST)
Updated Date: Mon, 22 Feb 2021 (07:31 IST)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संकटावर नियंत्रण मिळवले होते परंतु नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोना पुन्हा फोफावला आहे. यामुळेच राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. राज्यात रविवारी ६९७१ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर २४१७ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनाशी झुंज यशस्वी पार पाडून घरी परतले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २१,००,८८४ वर पोहोचला आहे. तर एकूण ५१७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्या आतापर्यंत १९,९४,९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात एकूण ५२,९५६ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशीही माहिती आरोग्या विभागाने दिली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध लादले आहेत. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे पुण्यात रात्री ११नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. त्याचप्रमाणे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील तीन जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात निर्बंध लावले जात आहेत. अमरावती जिल्ह्यात राज्य सरकारने सात दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर नागपूरमध्येही कडक निर्बंध लवकरचं घोषित होणार आहेत.