Publish Date: Mon, 14 Feb 2022 (23:30 IST)
Updated Date: Mon, 14 Feb 2022 (23:36 IST)
कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढउतार पाहायला मिळतात. राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्ये घट होत असल्याने कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांच्या मृत्यू दरातही घट झालेली आहे. राज्यात सोमवारी १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १,९६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६६ % एवढे झाले आहे.
तर ११ हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण ७६ लाख ६१ हजार ०७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्णालयातून घरी गेले आहेत. गेल्या २४ तासामध्ये राज्यात १ हजार ९६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात १२ कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे. राज्यातील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. दरम्यान आता कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यामुळे कोरनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. आजपर्यंत ७ कोटी ६५ लाख २७ हजार८९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ७८ लाख ४४ हजार ९१५ चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात एकूण ३६ हजार ४४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
सध्या राज्यात ३ लाख ४८ हजार ४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ८ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण ३ हजार ९९४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.