Publish Date: Tue, 19 May 2020 (16:51 IST)
Updated Date: Tue, 19 May 2020 (16:54 IST)
राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे सांगत आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला घेऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि पवारांवर टीका केली. “शरद पवार हे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी राज्यासाठी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहावे”, असा सल्लाच फडणवीस यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने २० लाख कोटींचे भरभक्कम पॅकेज दिले. मात्र तरिही पवारांनी मदत अपुरी असल्याचे सांगितले. हे राजकारण नव्हते का? जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही सूचना मांडल्या तर ते राजकारण कसे असू शकते? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे शरद पवार हे केंद्राकडे मदतीसाठी पत्र लिहितात, त्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंनाही एक पत्र लिहावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.