Publish Date: Tue, 16 Jun 2020 (08:31 IST)
Updated Date: Tue, 16 Jun 2020 (08:37 IST)
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर ) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. परंतू याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणा-या पृष्ठभागाचे स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे.