Publish Date: Sun, 29 Mar 2020 (17:12 IST)
Updated Date: Sun, 29 Mar 2020 (17:21 IST)
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत असताना होम क्वारंटाइन करण्यात आलेले काही लोक बाहेर उघडपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना सरळ जेलमध्ये टाका अशी मागणी केली आहे.
राजू पाटील यांनी डोंबिवलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर ही मागणी केली आहे. हे दोघेही परदेश प्रवास करुन आलेले असतानाही घरात न थांबता बाहेर फिरत होते. यामुळेच राजू पाटील यांनी होम क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना थेट जेलमध्ये टाकले जावे असे म्हटले आहे.