Publish Date: Fri, 25 Jun 2021 (16:47 IST)
Updated Date: Fri, 25 Jun 2021 (16:48 IST)
औरंगाबाद – कोरोना संसर्गानंतर आता म्युकर मायकोसिसच्या रुग्णांमध्ये दिवसेंंदिवस वाढ होत असून एकट्या औरंगाबादेत आतापर्यंत ५३ जमांचे प्राण गेले आहेत. तर, या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्याही पावणे सहाशेवर पोहोचली आहे. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला आहे. मात्र, म्युकर मायकोसिसचा विळखा घट्ट होत जातोय. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हेळसांड आणि मनस्तापाला सामोरे जावं लागतंय.
औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे 399 रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली होती. परंतु एकाच दिवसात तब्बल 177 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 576 वर गेली. आता ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच म्युकरमायकोसिसचा विस्फोट पाहता आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. औरंगाबादला म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पडला आहे. जिल्हातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अनेक रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसची खरी रुग्णसंख्या लपवली होती. मात्र आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे आणि मृत्यूंचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला मोठा धक्का बसलाय. म्युकरमायकोसिसचे आणखे बरेच रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.
आरोग्य यंत्रणेलाच माहिती नाही, काय चाललंय…?
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांची आरोग्य यंत्रणेलाच माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णांची माहिती आतापर्यंत समोर आलेली नव्हती. अखेर या संदर्भातील माहिती यंत्रणेला मिळाली आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र ही रुग्णालये नेमकी कोणती आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.