Publish Date: Mon, 01 Mar 2021 (07:48 IST)
Updated Date: Mon, 01 Mar 2021 (07:50 IST)
राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने वाढताना दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्याही ८ हजारापेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. शिवाय मृत्यूंची संख्या देखील पन्नासच्या वरच आहे. रविवारी ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित वाढले असून, ६२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ७५३ जण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता २१ लाख ५५ हजार ७० वर पोहचली आहे. राज्यातील मृत्यू दर २.४२ टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.९५ टक्के आहे.
राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७७ हजार ८ आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० नमूने (१३.२३ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात असून, ३ हजार ३३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.