Publish Date: Wed, 08 Jun 2022 (14:14 IST)
Updated Date: Wed, 08 Jun 2022 (14:17 IST)
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या सर्व भागांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. तर इतर शहरांत देखील वाढ होताना दिसते. कोरोना रुग्णसंख्येनं दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. राज्यात 1 हजार 881 नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे एकट्या मुंबईत 1 हजार 242 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत दुप्पट रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 39 हजार 816 रुग्ण बरे झाले आहेत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाधित होणाऱ्यांपैकी 1 टक्के रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय. मात्र मास्कची कुठेही सक्ती केलेली नाही. तसंच पंढरपुरची वारी देखील होणार असून, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांनी यावेळी राज्यातील एक-दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल सर्व माहिती उद्धव ठाकरेंना माहिती दिली असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.