Publish Date: Mon, 27 Apr 2020 (16:15 IST)
Updated Date: Mon, 27 Apr 2020 (16:17 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधानांना राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. ३ मे रोजी लॉकडाउनची मुदत संपत आहे. त्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंदर्भात मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं. राज्यांमधील ज्या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट आहेत. त्या जिल्ह्यांमधील लॉकडाउन ३ मे नंतरही कायम ठेवण्याची सूचना मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण नाहीत वा जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. अशा जिल्ह्यांमधील लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मोदी यांनी सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकारनं लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात राज्यांना निर्णय घेण्यास सांगितलं. यासंदर्भात धोरण ठरवण्याची सूचनाही मोदी यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउनचं काय होणार असाही प्रश्न चर्चेत आहे. राज्यातील जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत, त्या जिल्ह्यामधून लॉकडाउन शिथिल करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संवाद साधताना दिले होते. मात्र, लॉकडाउन शिथिल करताना राज्य सरकार जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवल्या जातील. दुसरीकडे ऑरेंज झोनमध्ये असलेल्या काही जिल्ह्यातील परिस्थिती आता सुधरली आहे. अशा जिल्ह्यामध्येही खबरदारी घेत व्यवहार सुरू करण्याची परवानगी सरकार देऊ शकते. मात्र, रेड झोनमध्ये असलेल्या जिल्हे ३ मे नंतरही लॉकडाउनमध्येच राहणार आहेत.