Publish Date: Wed, 06 May 2020 (09:18 IST)
Updated Date: Wed, 06 May 2020 (09:24 IST)
ना बॅण्डबाजा ना कसला गाजावाजा, घेऊन सोशल डिस्टन्सिंगची काळजी, उभारली संसाराची गुढी. आई, वडील, मामा, भटजी आणि वधू-वर अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अक्षय आणि किरण यांनी आपल्या नविन जीवनाचा प्रारंभ केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणार्या संचारबंदीचे नियम पाळत मलकापूर येथील वसंत पांडूरंग पवार आणि परिवाराने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत टाकल्या अक्षता.
जगभर कोरोनाने चांगलाच हाहाकार पसरवला आहे. परिणामी सर्वत्र दक्षता आणि सतर्कता अवलंबली जात आहे. गर्दी होणार नाही आणि गर्दी करु नये यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबल आहे. प्रसंगी कठोर कारवाईचा बडगाही उगारला आहे. अशा परिस्थितीत अनेक नव विवाहितांना आपल्या विवाह सोहळ्याचा प्रश्न सोडवायचा कसा हा प्रश्न सातत्याने भेडसावत होता मात्र जन्मोजन्मीच्या गाठी निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने काही बंधने घालत विवाह सोहळयांना परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मलकापूर ता. शाहूवाडी येथील अक्षय पवार आणि किरण यांचा विवाह सोहळा संचारबंदीच पालन करत आणि सोशल डिस्टन्स ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने करून आपल्या संसाररूपी आयुष्याला सुरुवात केली.
दरम्यान विवाह स्थळी प्रशासनाच्या नियमांच पालन करण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेचे अधिकारी ए. के. पाटील, प्रसाद हार्डीकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एकूणच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला पवार कुटुंबीयांनी प्रतिसाद देऊन या अशा भीषण संकटात ही आपण प्रशासनासोबत राहणं ही काळाची गरज असल्याचं या निर्णयातून दाखवून दिले असल्याने यापुढील काळातही अशाच माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाच्या या आव्हानाला जनतेन ही साथ देणे गरजेचे आहे.