Publish Date: Tue, 15 Sep 2020 (09:35 IST)
Updated Date: Tue, 15 Sep 2020 (09:37 IST)
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकीत्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपली मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच ०२२-२६५९२३६४ हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित आहे.
राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे ५०० मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या एक हजार पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे.