Publish Date: Sun, 02 Nov 2025 (10:15 IST)
Updated Date: Sun, 02 Nov 2025 (10:19 IST)
तुळशी विवाह कथा
कांची नगरात कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी असे होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याला मरण येईल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला. त्यांनी सांगितले की मंत्राचा जप करावा, तुळशीचीपूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा. मुलगी सांगितल्याप्रमाणे व्रत करू लागली.
एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. तो माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन माळिणीबरोबर किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. इकडे एका राजाचा पुत्र मुकुंद हा देखील त्या किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करत असे तेव्हा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे. कारण तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल.
यावर मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. तसेच किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले.
कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळल्यावर तो खूप दुःखी झाला. त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या. किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.
webdunia
Publish Date: Sun, 02 Nov 2025 (10:15 IST)
Updated Date: Sun, 02 Nov 2025 (10:19 IST)