Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Solar Eclipse : सूर्यग्रहण म्हणजे काय? खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?

Solar Eclipse : सूर्यग्रहण म्हणजे काय? खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?
, शनिवार, 4 डिसेंबर 2021 (07:52 IST)
आज या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण असेल. अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या मते, दक्षिण गोलार्धातील अनेक भागांमध्ये हे सूर्यग्रहण पाहायला मिळेल.
 
पण, भारत दक्षिण गोलार्धात नसल्यामुळे देशात हे सूर्यग्रहण दिसणार नाही.
 
पण हे सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? त्याचे प्रकार कोणते, हे आता आपण पाहणार आहोत.
 
सूर्यग्रहण म्हणजे काय?
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पण हे सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे?
 
ग्रहणं तीन प्रकारची असतात. शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती.
 
ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.
सूर्यग्रहण कधी होतं?
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण स्थिती म्हणतात. चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती स्थिती दिसते.
 
चंद्रग्रहण कधी होतं?
जर सूर्य आणि चंद्राच्या मधे पृथ्वी आली, तर चंद्रग्रहण होतं. पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं.
 
खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
 
एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
 
खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
कंकणाकृती सूर्यग्रहण का होतं?
पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.
 
याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.
 
ग्रहण किती वेळा दिसतं?
 
एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाददुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ. .
भारतातून याआधी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं. दक्षिण भारतातल्या कन्याकुमारीजवळच्या परिसरातून तब्बल सात मिनिटं ग्रहणाची कंकणाकृती स्थिती पाहायला मिळाली होती. तर यानंतरचं कंकणाकृती ग्रहण 21 जून 2020 रोजी उत्तर भारतातून दिसलं पण त्यानंतर पुढची अनेक वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.
 
ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र कीरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
 
ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते. पिनहोल कॅमेरा कसा तयार करायचा, त्याची माहिती इथे पाहू शकता.
'गैरसमज बाजूला सारून ग्रहणाचा आनंद घ्या'
ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत.
पण अशा प्रथा चुकीच्या असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, "ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये असेही सांगितले जाते.
 
"परंतु त्यात काहीही तथ्य नाही. काही लोक मला प्रश्न विचारतात की, आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे? मी त्यांना सांगतो, की जे लोक ग्रहण पाहतील, त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 04.12.2021