Publish Date: Mon, 11 Jun 2018 (09:08 IST)
Updated Date: Mon, 11 Jun 2018 (09:09 IST)
अडीच वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला. मला निष्कारण अटक झाली. एकाच ठिकाणी सात वेळा धाडी टाकून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; पण न्यायदेवतेमुळे बाहेर आलो आहे. आता लढाई रस्त्यावर होईल. पानिपतच्या लढाईत दत्ताजी शिंदे जसे म्हणाले, बचेंगे तो और भी लढेंगे. तसे ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी!’अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते छगन भुजबळ यांनी पुनश्च हरी ओम करीत सरकारविरोधात एल्गार पुकारला.राष्ट्रवादी काँग्रेसचा २०वा वर्धापन दिन व हल्लाबोल आंदोलनाची सांगता पुण्यात झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते़ भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उपरोधिक शब्दांत केंद्र आणि राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
सध्या शेतकरी रडत आहेत, व्यापारी रडत आहेत, सगळ्याच क्षेत्रातील नागरिकांचे सध्या हाल चालू आहेत. पण सरकारला पाकिस्तानची साखर गोड लागत आहे. भुजबळ म्हणाले, दोन वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल करण्यात आला. सगळीकडे छापे टाकण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चांगले महाराष्ट्र सदन बांधणे माझी जबाबदारी होती. ज्यावेळी घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा लाचलुचपत खात्याने मी दोषी नसल्याचा अहवाल दिला होता.
मात्र, त्याच खात्याने वर्षानंतर आपला निर्णय फिरवला.माझ्यावर अनेक घोटाळ्याचे खोटे आरोप करण्यात आले. परंतु, लोकांचे प्रेम ते हिरावून घेऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एकत्र यायला हवे. यापुढे मी नुसता बोलणार नाही, तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.