काही घटना अशा घडतात की आपण त्याचा स्वप्नातही विचार केलेला नसतो. याला योगायोगही म्हणू शकत नाही. कारण या गोष्टींची फारशी माहिती आपल्याला नसते. मानवी जीवनात अशी अनेक रहस्ये असतात. आपल्याला डोळे असूनही ती दृष्टीस पडत नाहीत. अशाच रहस्यांभोवती राम गोपाल वर्माने 'फूंक' गुंफला आहे.‘फूंक’ मध्ये अशाच रहस्यमय घटना आहेत. याचे कथानक एका छोट्या कुटुंबाभोवती फिरते. राजीव एक यशस्वी इंजिनियर आहे. पत्नी व दोन मुलगे असा लहानसा त्याचा परिवार आहे. राजीवचा परमेश्वरावर विश्वास नाही. परमेश्वर आणि अशा गूढ, रहस्यमय घटनांवर विश्वास ठेवणार्यांवर त्याचा राग आहे. एके दिवशी राजीवच्या घरात एक दुष्ट आत्मा प्रवेश करतो व त्याच्या कुटुंबाचा नाश करण्याची धमकी देते. या घटनेने राजीवच्या विचारांमध्ये कमालीचे परिवर्तन घडून येते.
रामूने याद्वारे विचित्र घटनांचा वेध घेतला आहे. या घटनांवर आपला विश्वास असो नसो, पण रामूची मांडणी अशी असते की त्यावर कळत नकळत विश्वास ठेवतो. 'फूंक'ही तसाच असेल अशी अपेक्षा आहे.