Publish Date: Sat, 18 Aug 2018 (11:37 IST)
Updated Date: Sat, 18 Aug 2018 (11:40 IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकतं? हीच अभिमानाची भावना 'गोल्ड' चित्रपट पाहताना मनात आणखी पक्की होईल. 1948मधील लंडन ऑलिम्पिकची ही घटना आहे. ही घटना ऐतिहासिक आहे. कारण स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झालं होतं आणि भारताचा हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये खेळत होता. उत्कटता आणि उत्साहानं भरलेल्या भारतीय हॉकी संघाचा प्रवास 'गोल्ड'मध्ये दाखवला आहे.
चित्रपटाचं कथानक 1936 पासून सुरू होतं. भारतीय हॉकी संघानं बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सलग तिसर्यांदा सुवर्णपदक जिंकलं होतं. तेव्हा हा ब्रिटिश इंडियाचा संघ म्हणून ओळखला जायचा. त्याचं व्यवस्थापन ब्रिटिश राजवटीकडून केलं जायचं. तेव्हा संघातील एका बंगाली कनिष्ठ व्यवस्थापकानं स्वतंत्र भारताच्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा संकल्प सोडला. 1948 मध्ये भारताचा तिरंगा इंग्लंडच्या भूमीत फडकावण्याचं त्याचं स्वप्न होतं. दिग्दर्शिका रीमा कागती यांनी गहन अर्थ असलेल्या या कथेला मनोरंजक पद्धतीनं सादर केलं आहे. सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. धोतर नेसलेल्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत अक्षय कुमार खूपच हसवतो पण लगेच भावनिकही होताना दाखवला आहे. कुणाल कपूरनं पहिल्यांदा हॉकीपटू आणि नंतर हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका चांगलीच वठवली आहे. विनीत कुमारचंही काम कौतुकास्पद आहे. अमित साधची भूमिकाही खूप चांगली आहे. सनी कौशलनं 'रागीट' स्वभावाच्या हॉकीपटूची भूमिका जबरदस्त साकारली आहे. 'गोल्ड' फक्त हॉकीवर आधारित चित्रपट नाही तर, एक ऐतिहासिक काळ त्यात दाखवला आहे.