दिग्दर्शकाने कथानकाऐवजी स्टंट दृश्यांवर जास्त मेहनत घेतली आहे आणि तिथेही चलाखी केली आहे. दिग्दर्शकाच्या कल्पनेप्रमाणे स्टंट दृश्य करणे महाकठीण काम होते. शिवाय त्यासाठी पैसा खूप लागला असता. त्यामुळे त्याने शक्कल लढवून सरळ ऍनिमेशनच साहय्याने ती दृश्ये चित्रीत केली. त्यामुळे विमानातून पैसे लुटण्याचे दृश्य हास्यास्पद झाले आहे. चित्रपटातील प्रसंग पापणी लवण्याच्या आत बदलत असल्याने विचार करण्यासा पुरेसा वेळही मिळत नाही. चित्रपटात प्रणयास काहीच स्थान नाही. विनोदाचाही दुष्काळ आहे. अजय व शमितामधील एक दृश्य तेवढे चेहऱ्यावर हसू आणते. अजय देवगण फारसा खुललेला दिसला नाही. त्याने दोनदा सांगितलेला किस्सा अस्पष्ट उच्चारणांमुळे समजत नाही.
रितेश तर झोपेतून सरळ सेटवर आल्यासारखा भासतो. झायेद जरा बरा वाटला. सुनील शेट्टी प्रत्येक चित्रपटात सारखाच वाटतो. नायिकांमध्ये शमितास अधिक वाव आहे. तिने आपली भूमिका चांगली साकारली आहे. दिया सुंदर दिसली, मात्र इशाचा मेकअप तिला सुट होत नाही. विशाल-शेखरचे संगीत चित्रपटाच्या प्रकृतीशी साधर्म्य राखते. 'माइंडब्लोइंग माहिया' हे गाणे चांगले जमले आहे. रेमो व राजीव गोस्वामींचे नृत्यदिग्दर्शन उत्तम. एकंदरीत काय तर कॅश म्हणजे बाजारात काहीहीह किंमत नसलेली नोट आहे.