Publish Date: Fri, 11 Feb 2022 (11:56 IST)
Updated Date: Sat, 08 Oct 2022 (15:09 IST)
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार टीका केली. गोव्यातील म्हापसा येथील जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की गोव्यातील तरुणांची राजकीय संस्कृती, आकांक्षा काँग्रेसला कधीच समजल्या नाही. गोव्याबद्दल त्यांच्या मनात नेहमीच वैराची भावना राहिली.
पीएम मोदी म्हणाले की गोव्याच्या या भूमीतून प्रेरणा मिळाली की येथे लोकांशी बोलत असताना माझ्या तोंडून अचानक 'काँग्रेस-मुक्त भारत' हा शब्द बाहेर पडला. आज हाच शब्द देशातील अनेक नागरिकांचा संकल्प बनला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की गोव्यातील लोकांना आजकाल काही नवे चेहरे दिसत आहेत. काही राजकीय पक्ष गोव्याला त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचे लाँच पॅड मानत आहे मात्र अशा पक्षांना गोव्यातील जनतेच्या भावनाही कळत नाहीत.
पीएम मोदी म्हणाले कि गोव्यातील जनतेला गोव्यातील लोकांसाठी काम करणारे सरकार हवे असून स्वार्थ साधण्यासाठी वापर करणाऱ्या सरकारला जनता कधीही स्वीकारणार नाही. त्या पक्षांकडे अजेंडा नाही, दूरदृष्टी नाही, गोवा समजत नाही. ते येथे आले आणि गेले पण काय घोषणा करायची हे देखील समजत नाही.
ते म्हणाले की गोव्यातील जनतेलाही त्यांचे सत्य कळले असून जनतेने या पक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमची हिंसा, दंगली आणि गुंडगिरी तुमच्याकडे ठेवा. गोव्याला प्रगतीच्या मार्गावर शांततेने वाटचाल करू द्या.
गोव्यात टीएमसी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याचवेळी आप देखील आपल्या बाजूने मतांचा प्रचार करत आहे.