साहित्य : अर्धा किलो सुरती पापडी, पाव किलो सुरण, सहा बारीक वांगी, तीन साधारण पिकलेली केळी, पाव किलो गोराडू, एक वाटी रताळी, पाव किलो फ्लॉवर, एक वाटी वालाचे ओले दाणे, पाव किलो जरा लहान आकाराचे बटाटे, कोवळ्या मेथीची एक जुडी, एक वाटी कणीक, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, लाल तिखट, मीठ धन्या-जिऱ्याची पूड, साखर, ओवा, हिंग, हळद, गोडा मसाला, तेल, लिंबू.
कृती : सर्व भाज्या धुऊन घ्याव्यात. मेथी निवडून, बारीक चिरून घ्यावी. त्यात कणीक, चण्याचे पीठ, चवीप्रमाणे तिखट व मीठ, धन्या-जिऱ्याची पूड, चवीपुरती साखर, हिंग, थोडी हळद, असे सर्व जिन्नस घालून व जरा जास्त तेलाचे मोहन घालून, एकत्र मिसळावे व चांगले कालवून त्याचे लहान लहान मुटके करावेत व ते तेलात तळून काढावेत. पापडी निवडून घ्यावी व त्याला पाव चमचा सोडा व दोन चमचे तेल लावून ठेवावे. प्रत्येक केळ्याचे सालासकट तीन-तीन तुकडे करावेत. रताळ्याचे मोठे मोठे तुकडे करावेत. सुरणाच्या मोठ्या फोडी कराव्यात. गोराडूच्याही मोठ्या फोडी कराव्यात. फ्लॉवर चिरून मोठे मोठे तुकडे करावेत. भरल्या वांग्याकरिता चिरतात, तशी वांगी व बटाटे चिरावेत.
तिखट, मीठ, धन्या-जिऱ्याची पूड, दोन चमचे डाळीचे पीठ, थोडा गोडा मसाला, थोडा गूळ किंवा साखर, थोडा लिंबाचा रस हे जिन्नस एकत्र करावेत. तेल तापवून, त्यात थोडा हिंग घालून, ते तेल वरील एकत्र केलेल्या मसाल्याच्या जिनसांवर घालावे व तो मसाला बटाट्यांत व वांग्यांत भरावा. नंतर चुलीवर पातेले ठेवून, त्यात थोडे तेल घालून, ओवा घालावा व पुन्हा जरा जास्त तेल घालावे व लगेच त्यात पापडीच्या शेंगा आणि वालाचे दाणे पसरून घालावेत. असल्यास ओल्या तुरीचे दाणे घालावेत. एक वाफ आल्यावर त्यावर अंदाजाने तिखट, मीठ व साखर घालावी. नंतर त्यावर वांगी, सुरण, बटाटे, गोराडू, रताळी व वर फ्लॉवर व केळी घालावीत. नंतर झाकण ठेवून मंद शिजवावे. एक वाफ आल्यावर वरील तयार करून घेतलेले मुटके घालावेत व मंद विस्तवावर भाजी पूर्ण शिजवून घ्यावी. ही भाजी चवीला फारच रुचकर लागते. गरम गरमच खाण्यास जास्त चांगली लागते.