Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपंचमी -सर्प संवर्धन दिन

नागपंचमी -सर्प संवर्धन दिन
, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (17:32 IST)
साप हा निसर्गातील एक महत्वाचा घटक आहे .सापामुळे मानवाला खूप फायदे होतात. धन्य उत्पादनापैकी २६ टक्के धान्य उंदीर फस्त करतात. वर्षातून एक उंदराची जोडी ८८८ पिलांना जन्म देते. एका उंदराचे आयुष्य १६ वर्ष असते. जर कां उंदरांवर नियंत्रण ठेवले नाही तर सर्व धान्य उंदीरच साफ करतील. सापांना उंदरांचा कर्दनकाळ समजतात. सापाच्या कातडीपासून कमरेचे पट्टे, पर्सेस, पाकिटे, दिव्यांच्या झडपा इत्यादि शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. ब्रम्हदेश, चीन इत्यादी देशांत सापाचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. सापाच्या विषापासून लस निर्माण करून तिचा वापर सर्पदशांवर तसेच कुष्ठरोगावर, फेफरे, दमा, पाठदुखी यावर औषध म्हणून वापरले जाते. सापाचे रक्त कोड बरे करण्यासाठी सुध्दा वापरले जाते.
 
जगात सुमारे दोन हजार पाचशे जातीचे साप आहेत. भारतात सापाच्या चारशे ते साडेचारशे जाती आढळतात .यापैकी केवळ सत्तर जाती विषारी आहेत. जमिनीवर असलेले चार विषारी साप म्हणजे नाग, फुरसे, घोणस व मण्यार. "हायड्रोफीस बेलचरी" हा ऑस्ट्रेलिया जवळच्या समुद्रात आढळणारा साप सर्वात अधिक विषारी म्हणून ओळखला जातो. साप दूध पित नाही.
 
साप हा मानवासाठी उपयुक्त असला तरी आपल्या मनात सापाबद्दल भीती व तिरस्कार आहे .साप शंभर वर्ष जगतो. परंतु अनेक कारणांमुळे सापाची हत्या झाली त्यामुळे अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. सापांची संख्या कमी होणे मानवासाठी हानिकारक आहे याची जाणीव पूर्वजांना झाली म्हणून भारतीय संस्कृतीत साप हा देवाचे प्रतिक मानले व "श्रावण शुध्द पंचमीला नागपंचमी" मानून नागाची भक्तीभावाने पूजा करण्याची पध्दत सुरू करण्याची प्रथा सुरू झाली. साप हा देवाचे प्रतीक आहे ही कल्पना केवळ भारतात नसून जपान, चीन इत्यादी देशांतही रूढ आहे.'नागस्तोत्र' नावाचे स्तोत्र तयार करण्यात आले असून त्यात सापांचे महत्व पटवून दिले आहे.
 
साप हे शक्यतो जंगलांत राहतात. सध्या जंगले नष्ट होऊ लागल्यामुळे साप मनुष्यवस्तीत येतात व त्यांची हत्या होते. पर्यावरण प्रेमींनी नागपंचमी हा दिवस सर्प संवर्धन दिन म्हणून साजरा करून 'मी यापुढे साप मारणार नाही व कोण मारत असेल तर त्यास प्रतिबंध करीन' अशी प्रतिज्ञा केली तरच सापांचे सरंक्षण होईल.
 
नागपंचमी आणि बहिणाबाई  
सुप्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई यांचा जन्म १८८० साली नागपंचमीस झाला. त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग घडला. त्यांचा मुलगा (सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी) तान्हा असताना त्याला टोपलीत घालून त्या शेतावर गेल्या. आम्ब्याच्या झाडाखाली टोपली ठेवून त्या शेतात काम करु लागल्या. थोड्या वेळाने त्यांचे टोपलीकडे लक्ष्य गेले तर टोपलीजवळ नाग फणा काढून डोलत होता तर टोपली उपडी पाडून बाळ नागासोबत खेळत होता. ते दृश्य पाहून बहिणाबाई घाबरल्या. त्यांनी नागोबाला हात जोडून विनंती केली की तुला शंकराची शंकराची शपथ आहे तू माझ्या बाळाला दंश करु नकोस. त्यांनी परमेश्वराचा सुद्धा धावा केला. योगायोगाने लहान बालकाशी खेळणारा नाग बालकाला काहीही न करता निघून गेला. बहिणाबाई या दैवी चमत्काराबद्दलची हकीगत काव्यात फार सुंदर रितीने वर्णिली आहे . 
ऐकू ये आरायी
धावा,धावा,घात झाला 
अरे धावा लवकरी 
आम्ब्याखाली नाग आला, 
फना उभारत नाग 
व्हता त्याच्यामंदी दंग 
हारा उपडा पाडूनी 
तान्हा खेये नागासंग  
हात जोडते नागोबा 
माझं वाचरे तान्हा 
अरे नको देऊ डंख 
तुले शंकराची आन  
आता वाजव,वाजव
बालकिसना,तुझा पावा
सांग सांग नागोबाले 
माझा आयकरे धावा  
तेवढ्यात नाल्याकडे 
ढोखऱ्याचा पावा वाजे 
त्याच्या सुरांच्या रोखाने 
नाग गेला वजे वजे  
तव्हा आली आम्ब्याखाली 
उचललं तानक्याले 
फुकीसनी दोन्ही कान 
मुके कितीक घेतले  
देव माझा रे नागोबा 
नही तान्ह्याले चावला 
सोता व्ह्यसनी तान्हा 
माझ्या तान्ह्याशी खेयला  
कधी भेटशीन तव्हा 
व्हतीत रे भेटीगाठी 
येत्या पंचमीले 
आणीत दुधाची रे वाटी  
 
अशातर्हेचा नागाच्या संदर्भातील अनुभव अनेकांना आला असेल .बहिणाबाई यांनी मात्र स्वताच्या अनूभवाला काव्याततील गुम्फुन नाग हा मानवाचा मित्र आहे हे सिध्द केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावण शुक्रवार कहाणी : जिवतीची कहाणी