पाटरत नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जावून स्नान व भगवान शंकराची पूजा, असा त्याचा नित्यक्रम होता. वाटेत एक वेळूचं बेट होतं. तो घराकडे परतत असतांना, 'मी येऊं? मी येऊं? असा ध्वनी ऐकू यायचा. हा मागेपुढे पहायचा तर कोणीच नाही. त्याचे मनात भीती भरली.
काळजीने तो बारीक होवू लागला. तेव्हां गुरुंनी विचारलं, खायला-प्यायला वाण नाही. बाबा असा रोड का? शिष्याने सर्व हकीकत गुरूंना सांगीतली. गुरूजी म्हणाले, भिऊ नको, मांग काही पाहू नको! खुशाल त्याला ये म्हण! तुझ्यामागून येऊ दे! मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणं स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला, मी येऊ? असा ध्वनी कानावर पडला की, ये असा जबाब दिला. मांग काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला.
PBarnale
गुरूजींनी पाहिलं, ती एक मुलगी आहे. त्या दोघांचं लग्न लावून त्यांना रहायला एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावण सोमवार आला. बायकोला म्हणाला, माझी वाट पाहू नको. उपाशी राहू नको. नित्यनेमाने सकाळी उठून शंकराचे पूजेला जायचा. पत्नीने थोडी वाट पाहिली, सैपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अगं अगं दार उघड! पत्नीने पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं पती घरात आले. नित्यनेम करू लागले.
पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. चारही सोमवारी असचं झालं. शेवटचा सोमवार आला. रात्री नवल झालं, दोघंजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला, हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा! ही रत्नं कुठून आणली? मनात भिऊन गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं आहे. वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल!
पतीसह चालली, मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध घटकेचं माहेर दे! तो वेळूचं बेट आलं, मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला, जेवणं झाली, सासूसासर्यांची आज्ञा घेतली, घरी परतली.
अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयतं परत गेली. घर नाही दार नाही. शिपाई नाहीत. प्यादे नाहीत, दासी नाहीत, एक वेळूचं बेट आहे, तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवर्यांनं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं.
अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा पूर्ण झाली. जसा शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो!