मनाच्या कणाखरपणासाठी मंत्राचा जप औषध आहे.
जर सारे जग निरनिराळ्या रंगांच्या मागे धावत आहे तर भगवंताने हे घनश्याम रूप का घेतले? याचा विचार करतर असे वाटते की हृदयातील काळे काळे मेघ अती उज्जवळ रूपावरून ओवाळून टाकावेत इतके सुंदर आहेत. ग्रीष्म ऋतूच्या अतिभयंकर उष्णतेने धरती तापत होती. जमिनीत पेरलेले बी भाजून निघत होते. आटलेल्या नद्या दु:खाने निश्वास टाकीत होत्या. अन्नपाण्याशिवाय आम्ही कसे जगू ह्या काळजीने सृष्टीवरील प्रत्येक प्राणी आकाशाकडे लक्ष लावून बसला होता. त्याच वेळी सप्तरंगी अलंकार ल्यायलेल्या मेघाला दया आली. तो धावत धावत सागरा पाशी गेला, ज्याप्रमाणे जगताच्या कल्याणार्थ शिवाने विष प्राशन केले. त्याप्रमाणे मेघ समुद्राचे खारे पाणी पिऊ लागला. त्यामुळे त्या सप्तरंगी मेघाचा रंग काळाशार झाला त्याने समुद्रातील मीठ स्वत:जवळ ठेवले व निर्मल पाण्याचा वर्षाव पृथ्वीवर केला. हे पाहून भगवंताने विचार केला की मलाही अशा मंगल कार्याकरता पृथ्वीवर अवतार घ्यायला हवा. मला माझे अवतार कार्य लक्षात राहावे म्हणून मी असेच घनश्यामरूप धारण करीन. धन्य आहे भगवंत.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी