मनाची धूर्तता:-
अहंकार आणि ममता हे सुख दु:खाला कराणीभूत होतात. मांजर घरात पाळलेल्या पोपटाला पकडून नेते तेव्हा आपल्याला वाईट वाटते पण तीच उंदीर पकडते तेव्हा वाईट वाटत नाही. याचे कारण आमचे पोपटावर प्रेम असते. आणि उंदरावर नसते, मन म्हणते माझे प्रेम पोपटावर आहे. पोपट माझा आहे. मनच ममता आणि अहंकार निर्माण करते. आणि मनच सुखाचा अनुभव घेते. जिथे प्रेम असते तिथे तनमन धनाचा व्यय झाला तरी दु:ख होत नाही.
प्रेम नसते तिथे थोडासा पैसा खर्च झाला, कष्ट झाले की दु:ख होते. रात्री 10 वाजता एकाद्या साधूला स्वयंपाक करून वाढायची वेळ आली की लगेच त्रास होतो तेच माहेरचे कोणी रात्री 12 वाजता येऊ द्या किती प्रेमाने त्यांच्या करता स्वयंपाक होतो, किती आग्रहाने त्यांना वाढण्यात येते. हा संसारातील अनुभव बोलका आहे. तेव्हा मनुष्याचे मनच अहंकार, ममतेची भिंत उभी करते आणि त्याला कुमार्गाकडे वळविते.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी