शंकराच्या पूजेत बेलाच्या पानाला फार मान आहे. शंकराने विषप्राशन केल्यामुळे त्याच्या शरीराची होणारी आग शमवण्यासाठी भक्तगण त्याला अभिषेक करतात. शंकराने आपल्या मस्तकावर गंगेला स्थान दिले आहे. मारुतीला शंकराचा अकरावा अवतार मानतात. पूर्ण महिनाभर शिवभक्त शिवपुराण, शिवालीलामृत, शिवकवच, शिवचालिसा, शिव पंचाक्षर मंत्र, शिव पंचाक्षर स्त्रोत, महामृत्यूंजय मंत्राचा जप तसेच रुद्र व महिम्नाची आवर्तने करतात. श्रावण महिन्यातील ह्या आवर्तनांनी विशेष लाभ होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
''त्र्यैलोक्यातील सात द्विपांपैकी पृथ्वी एक पवित्र क्षेत्र आहे. पृथ्वीवरील महत्वाचे धरणीतीर्थ (पवित्र भूमी) आहे. भारतात भगवान शंकराची बारा ज्योर्तिलिंगे आहेत. शिवपुराणात ह्या ज्योर्तिलिंगाचा उल्लेख आहे. ज्योर्तिलिंगाच्या दर्शनाने पूर्ण त्र्यैलोक्य दर्शनाचे फळ मिळते असे म्हणतात. आकाश ज्याचे लिंग, पृथ्वी ज्याची पाठ, असा तो भगवंत येथेच वास करतो. पद्म पुराणाच्या पाताल खंडाच्या आठव्या अध्यायात म्हटले आहे की, जो माणूस ह्या बारा ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतो त्याच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतातच पण स्वर्ग आणि मोक्ष यासारख्या दुर्लभ गोष्टीही त्याला मिळतात.''