Publish Date: Tue, 02 Feb 2016 (11:21 IST)
Updated Date: Tue, 02 Feb 2016 (11:22 IST)
महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदाचे संस्थापक समर्थ रामदास यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म एप्रिल 1608 मध्ये जालना जिल्ह्यातील जांब येथे चैत्र शुद्ध नवमीस (रामनवमी) झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी तर आईचे नाव राणूबाई होते. त्यांचे मोठे भाऊ गंगाधर हे विद्वान होते. वयाच्या बाराव्या वर्षी स्वत:च्या विवाहाच्यावेळी ‘सावधान’शब्द ऐकताच रामदासांनी तेथून पलान केले. नाशिकमध्ये टाकळी येथे त्यांनी 12 वर्षे रामनामाचा जप करीत तपशर्च्या केली. त्यानंतर 12 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यांची विपुल रचना प्रसिद्ध असून ‘मनाचे श्लोक’आणि ‘दासबोध’ हे त्यांचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत.
रामाला व हनुमंताला उपास्य दैवत मानणार्या रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. धर्मकारणात जाणीवपूर्वक राजकारण अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. गावोगावी राम आणि हनुमान यांची मंदिरे स्थापन करून त्यांनी व्यायाम आणि स्वधर्म निष्ठेचा प्रसार केला. अनेक शिष्य जमवून मठ स्थापन केले. त्यामधून समाजात स्वाभिमान जागृत केला. 2 फेब्रुवारी 1681 मध्ये सज्जनगड जिल्हा सातारा येथे त्यांचे निर्वाण झाले.