Publish Date: Mon, 12 Nov 2018 (14:23 IST)
Updated Date: Mon, 12 Nov 2018 (14:25 IST)
भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढत असून जानेवारी ते जून या कालावधीत भारतात सायबर हल्ल्याचे तब्बल ६.९५ लाख गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँड येथून झालेल्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. एफ सेक्युअर या सायबर सुरक्षेसंबंधी संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँडमधून या सहा महिन्यांमध्ये ४.३६ लाख सायबर हल्ले झाल्याचे एफ सेक्युअरने म्हटले आहे. जगभरातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांची माहिती जमा करण्यासाठी तसेच सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या संस्थेने जगभरात ४१ ठिकाणी हनिपॉट्स नेमले आहेत. या हनिपॉट्सनी दिलेल्या आकडेवारीवरून हा अहवाल करण्यात आला आहे. भारतातून परदेशात केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्याबाबतही यात माहिती यामध्ये देण्यात आली असून ते प्रमाण अतिशय कमी आहे. साधारण ३५,५६३ इतके त्याचे प्रमाण आहे. हे सायबर हल्ले भारतातून प्रामुख्याने ऑस्ट्रिया, नेदरलँड, ब्रिटन, जपान आणि युक्रेन देशात करण्यात आले आहेत. तर सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या जागतिक यादीत भारताचा २१वा क्रमांक लागतो, असे या संस्थेने म्हटले आहे.