Publish Date: Thu, 05 Sep 2019 (10:13 IST)
Updated Date: Thu, 05 Sep 2019 (16:44 IST)
अमिताभ बच्चन यांचे पूर्ण कुटुंब स्थानबद्ध झाले आहे, मात्र त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे सर्व झाले आहे वरून राजामुळेच. पावसाळ्यात आर्थिक राजधानी व स्वप्नाचे शहर असलेले, मुंबईत कधी किती पाऊस होईल, याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. त्यामुळे मुंबईच्या पावसावर कधी विश्वास ठेवायचा नसतो असे मुंबईकर म्हणतात. तुम्ही अंदाज लावला तर तो चुकतो तर मुंबईचा पाऊस नेहमीच अंदाज लावण्यापलिकडचा असतो. या पावसाळ्यात जोरदार पावसाने मुंबईकरांना अनेकदा झोडपून काढले. यात आता बॉलिवूडच्या सेलेब्रिटींचाही समावेश झाला आहे.
जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात देखील पाणी शिरले आहे. बिग बींच्या (Big B) यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पाऊस सातत्याने सुरू असल्याने आता हे पाणी बंगल्याच्या परिसरात देखील घूसत आहे. प्रतीक्षा या आपल्या बंगल्यात अमिताभ पत्नी जया, मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्यासह राहतात. पाणी साठल्याने या सर्वांचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे ते एक प्रकारे अडकूनच पडले आहेत.