Publish Date: Mon, 06 Jan 2020 (14:48 IST)
Updated Date: Mon, 06 Jan 2020 (14:50 IST)
JNU मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी जेएनयूतील हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करण्यासारखे काही नाही असे ही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. देश भरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंबई आणि पुण्यात देखील याचे पडसाद बघायला मिळाले आहे. तसेच यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी म्हटले की चेहरा लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्रातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा शब्दातही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आाहे.
गरज भासल्यास महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये सुरक्षा वाढवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.