Publish Date: Tue, 05 Jun 2018 (14:42 IST)
Updated Date: Tue, 05 Jun 2018 (14:45 IST)
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून जबरदस्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘काला’वर बंदी घालण्यात आली आहे. कन्नड अस्मितेचा मुद्दा लावून धरणाऱ्या संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. रजनीकांत यांनी कावेरी नदीतून तामिळनाडूला जास्तीचं पाणी मिळावं अशी मागणी केली होती. या मागणीमुळेच या चित्रपटाला विरोध करण्याचं कर्नाटकातील काही संघटनांनी ठरवलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी कावेरीच्या पाणीवाटपासंदर्भात आदेश दिला होता. या आदेशामुळे तामिळनाडू ऐवजी कर्नाटकाला जास्त पाणी मिळालं आहे. याचा निषेध करण्यासाठी रजनीकांत आणि कमल हसन या दक्षिणेतील दिग्गज कलाकारांनी आंदोलन देखील केलं होतं. तमिळनाडूतील वाढत्या विरोधामुळे चेन्नईतील आयपीएलचे सामने दुसऱ्या शहरांमध्ये खेळवावे लागले होते.
रजनीकांत यांनी कर्नाटकऐवजी तामिळनाडूला जास्ती पाणी मिळावं यासाठी आग्रह धरल्याने त्यांच्या आगामी चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील स्थानिक वितरकांनी हा चित्रपट सिनेमागृहात न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित केला जाणार नाहीये.