Publish Date: Fri, 28 Sep 2018 (14:26 IST)
Updated Date: Fri, 28 Sep 2018 (14:30 IST)
देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणार्या महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि एका संस्थेला केंद्रीय पर्यटनमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे. अल्फॉन्स यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016-17 वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणार्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील 'लेमन ट्री हॉटेल' यांच्यासह मुंबई येथील 'ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल ठरले आहे. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरण स्नेही वातावरण जपण्यात आले आहे.