Publish Date: Sat, 20 Oct 2018 (08:02 IST)
Updated Date: Sat, 20 Oct 2018 (08:03 IST)
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला आहे . ११ हजार लाभार्थ्यांना घरकुल दिले गेले. निवडक १० लाभार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींसोबत संवाद साधला. नंदूरबार, नागपूर, सातारा, अमरावती, सोलापूर, लातूर, सातारा, ठाणे या जिल्ह्यातील घरकुल योजना लाभार्थ्यांशी मोदींनी संवाद साधला आहे. या आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं बांधली , मात्र त्याच कालावधीत आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली आहेत. नियत स्वच्छ असेल तर काम जलद होतात अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका केली आहे. जर आधीचं सरकार सत्तेवर असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून 20 वर्षे तरी लागली असती. योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त आणि फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली. शिर्डीत आलेल्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांची चावी देण्यात आली. यानंतर मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.
सर्वप्रथम नंदूरबारच्या लाभार्थ्यांशी बोलताना मोदींनी मराठीतून त्यांची विचारपूस केली. तुम्हाला हक्काच्या घरात प्रवेश करताना कसं वाटतय ? तुम्हाला कोणाला लाच द्यावी लागली का ? असे प्रश्न मोदींनी त्यांना विचारले. नागरिकांनी यावेळी मोदींना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले. नंदूरबारला आपण याआधी अनेकवेळा आल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी नंदूरबारच्या प्रसिद्ध चौधरी चहाची आठवण सांगितली. तुम्हाला चौधरी चहा माहिती आहे का ? मी नंदूरबारला आल्यावर चौधरी चहाचा आस्वाद घ्यायचो असे मोदींनी सांगितले.
काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या कामांची तुलनादेखील केली. 'आधीचं सरकार घरासाठी 70 हजार रुपये द्यायचं. आम्ही घरासाठी 1 लाख रुपये देतो. याशिवाय भाजपा सरकारनं दिलेल्या घरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आम्ही गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरं उभारली. मागील सरकारच्या कामाचा वेग पाहता इथंपर्यंत पोहोचायला त्यांना आणखी 20 वर्ष लागली असती,' अशी आकडेवारी सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदीजी तुमचे २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे स्वप्न आम्ही २०१९मध्येच पूर्ण करु असे आश्वासन दिले. साडेचार लाख घरकुलांच बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात २०१ तालुक्यात कमी पाऊस झाला असून दुष्काळाची शक्यता आहे असे फडणवीस म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधानांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते साईबाबांची धूपआरती करण्यात आली.
webdunia
Publish Date: Sat, 20 Oct 2018 (08:02 IST)
Updated Date: Sat, 20 Oct 2018 (08:03 IST)