तेरच्या पश्चिमेस नागठाण म्हणून एक वास्तू आहे. ही वास्तू दगडाने बांधलेली असून गर्भग्रहाच्या भिंतीत एक शिल्पयुक्त फरशी आहे. त्या शिल्पात चैत्य व त्यावर नागवृक्ष दाखविलेला आहे. त्याचबरोबर खुद्द पार्श्वनाथ वस्ती ही एक चार दालनाची इमारत असून त्यात पार्शवनाथ, महावीर व चामरधारींच्या मूर्ती आहेत. जिनवीसहित सापडलेल्या लेखानुसार या जैन मंदिराचा काल इसवी सन १४ ते १६ वे शतक असा आहे. अगदी अलीकडच्या काळातील नृसिंह व रामेश्वरांची मंदिर येथे आहे. नृसिंहाचे मंदिर गावच्या आग्नेयेस अर्ध्या मैलावर असून ते विटांनी बांधलेले आहे. गावठाणाच्या रामेश्वराच्या मंदिरात शिवाचे मंदिर आहे.
तेर येथे संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. संत गोरोबा कुंभार यांना तत्कालीन संत नामदेव, ज्ञानदेव हे आदराने काका म्हणून संबोधित. दरवर्षी गोरोबा काकांची पालखी येथून पंढरपूरला जाते. कै. रामलिंगप्पा खंडाप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा लामतुरे यांनी पुरातन वस्तुचे संग्रह केल्यामुळे तेरची ख्याती झालेली आहे. कै. रामलिंगप्पा यांनी छंद म्हणून तेर व परिसरात सापडलेल्या जुन्या वस्तुंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. या वस्तूंमध्ये जुनी नाणी, मातीच्या मुर्ती, हस्तीदंताच्या मुर्ती, शंखाच्या बांगडा, दगड व मातीचे विविध आकाराचे मणी, अलंकार, रोमन बनावटीचे दिवे, कर्णभूषणे यांचा संग्रह आहे. हा संग्रह इतिहास व संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा आहे.
रामलिंगांप्पा यांनी सन १९६१-१९६२ साली हा संग्रह विनामुल्य महाराष्ट्र शासनाला दिला. १९६७ साली शासनाने ५ हजार वस्तू असलेला हा संग्रह घेण्याचा निर्णय केला हा दुर्मिळ वस्तुसंग्रह एका छोटा इमारतीत संचलित असून पुरातत्व विभागातर्फे याची व्यवस्था पाहिली जाते. या संग्रहालयात हस्तीदंताची स्त्रीमुर्ती विशेष लक्ष वेधून घेते. शंखापासून निर्मित बांगडा, मणी, बौद्ध धर्मियांची धार्मिक चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त देवदेवतांच्या मुर्ती, दिवे, व धातूची नाणी यांचा संग्रह आहे. गावच्या तेरणा नदीच्या तीरावर कोट टेकडी, साहोरे टेकडी, मुलानी टेकडी तर उत्तर तीरावर सुलेमान टेकडी, रेणुका टेकडी, सुतार टेकडी आहेत. या टेकडींच्या खाली तेरचा इतिहास दडला आहे.
तेर हे सात वाहनाच्या काळात व्यापारी व कला केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तर गुप्त, चालुक्य यांच्या काळात धार्मिक वास्तु व मंदिर निर्मितीसाठीही महत्त्वाचे होते. यादव काळापर्यंत येथे मंदिराची निर्मिती होती. संत गोरोबाकाकांच्या समाधी शेजारी एक दगडी घाट बांधलेला आहे. भाविकांची सोय व्हावी म्हणून पूल वजा कोल्हापूरी बंधारा बांधलेला आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले तेर ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.