क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.
MH Govt
MH GOVT
कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्नातला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.
MH Govt
MH GOVT
लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत. धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.
MH Govt
MH GOVT
येथील समुद्रकिनार्यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते.
कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे.
कसे पोहचाल : तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.